पुढील वर्षी होणाऱया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडोमोडींना वेग आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची झालेली भेट तसेच शिवसेनेनेदेखील आता मुंबईच्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून महापालिका निवडणुकांची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचा विचार करता केरळ किंवा गोवा या राज्यांपेक्षा मोठे बजेट असलेल्या आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने शिवसेनेपेक्षा अवघ्या 5 ते 6 जागा कमी मिळवल्या होत्या त्यानंतरही शिवसेना आणि भाजपने 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले, त्यामुळे 2022 ला होणारी महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी खूपच प्रतिष्ठेची असणार आहे. भाजप आणि मनसे यांची युती होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या मुंबईतील बहुतांश उत्तर भारतीय मतदार जो कधी काळी काँग्रेसकडे होता तो आता भाजपकडे आहे, मनसेशी युती केल्यास तो पुन्हा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्याने ही युती होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
मुंबईत उत्तर भारतीयांचे मोठे प्राबल्य असून हा मतदार कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नेहमी उभा राहिला असल्याचे बघायला मिळते, यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतून संजय निरूपम, माजी आमदार कृपाशंकर सिंग आणि राजहंससिंग यांनी उत्तर भारतीयांचे नेतृत्व केले. त्यातील राजहंससिंग हे तर महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक इतकेच नव्हे तर महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे, मात्र आता कृपाशंकरसिंग आणि राजहंससिंग हे दोन्ही माजी आमदार काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत तर माजी खासदार संजय निरूपम हे फारसे सक्रिय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकीकडे भाजपने काँग्रेसमध्ये असलेल्या उत्तर भारतीय नेत्यांना भाजपात आणलेले आहे हे तेच नेते आहेत ज्यांनी मनसेच्या विरोधात काँग्रेसमध्ये असताना आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे भाजपाकडून शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी एकतर दबावतंत्राचे राजकारण केले जात असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेनेदेखील मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रश्नांना आता प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकताच झाला तर मुंबईतील मेट्रोचे जाळे असणारे विविध मेट्रो प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून येत्या काही महिन्यात मेट्रो रेल्वे काही ठिकाणी सुरू झाली तर त्याचा लाभ हा राज्य सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारला होणार आहे. कांदिवली येथील मेट्रो रेल्वेची चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आली मात्र या कार्यक्रमाला सरकारमधील तीनही पक्षाचे प्रमुख नेते असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आले नव्हते. त्यांचे नावही नसल्याचे ज्या फडणवीस यांच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली त्याचे श्रेय आज शिवसेना घेत असल्याचे शल्य भाजपला असल्याने या चाचणी कार्यक्रमाच्या वेळी भाजपने जोरदार आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केले.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या 43 नगरसेवकांना डीपीडीसीच्या फंडातून 3 हजार 693 कोटी दिले होते, त्यावरून काँग्रेसचे नेते जनार्दन चांदुरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती, आदित्य ठाकरेंनी दिलेल्या या फंडामुळे उपनगरात मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरू असून शिवसेनेच्या नगरसेवकांना याचा चांगलाच लाभ झाल्याचे बघायला मिळत आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे रोज मुंबईतल्या प्रभागात महापौरांसोबत भेटी देऊन तेथील विकास कामाचा आणि समस्यांचा आढावा घेताना दिसत आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे 1997 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढविली होती त्याप्रमाणे 2022 ची महापालिका निवडणुकीची धुरा ही आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर असणार आहे. त्यादृष्टीने आदित्य ठाकरे हे इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना आपल्या पक्षात खेचून आणतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर आमदार असलेले शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम आणि काँग्रेसचे आमदार आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांची आमदारकीची टर्म ही डिसेंबर 2021 ला संपत आहे, आता आगामी मुंबई महापालिका निवडणुका बघता या जागी कोणाला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात कळेल. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले सचिन अहीर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असली तरी ऐनवेळी काहीही चमत्कार घडू शकतो तर मुंबई महापालिका निवडणूक बघता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पक्ष पुन्हा संधी देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या 12 निलंबित आमदारांपैकी 4 आमदार हे मुंबईतले आहेत त्यातील आशिष शेलार आणि योगेश सागर हे मागील सरकारमध्ये मंत्री होते तर सध्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी असणारे अतुल भातखळकर यांच्यासोबतच पराग अळवणी यांना देखील एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या 6 महिन्यावर निवडणुका आल्याने या आमदारांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. हेच निलंबन वर्षभरासाठी कायम राहिले तर भाजपसाठी हे परवडणारे नाही. एकूणच आता मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
प्रवीण काळे