प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील एका बंटी-बबलीने लग्नाचे अमिष दाखवून अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या दोघावर इस्लामपूर पोलीसांनी दोन महिने पाळत ठेवून शनिवारी त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी इस्लापूर आणि सांगलीत चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अतुल जगताप (वय 42) व श्वेता अतुल जगताप (वय 36 दोघे रा. सातारा) असे या बंटी-बबलीचे नाव आहे.
तक्रारदार तरूणाच्या लग्नासाठी कुटुंबीय मुली पाहात होते. जुलैमध्ये एका वृत्तपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोबाईलवर संपर्क साधून त्याच्या नातेवाईकांनी लग्नासंदर्भात विचारणा केली. यावेळी अतुल जगताप याने अरूण जाधव असे खोटे नाव सांगून मुलगी पाहण्यास येण्यास सांगितले. यानंतर 8 जुलैला सातारा येथील एका हॉटेलमध्ये मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही बाजूंकडून पसंती मिळाली. 18 जुलैला लग्नाची तारीख ठरली. मात्र दोनच दिवसांत श्वेता आणि अरूण यांनी संबंधित तरूणाशी मोबाईलवर संपर्क साधत बस्ता काढण्यासाठी 30 हजार रूपये बँक खात्यावर पाठवा, असे सांगितले. त्यावर विश्वासाने संबंधित कुटुंबियाने ही रक्कम दिली. त्यानंतर दोन दिवसांनी संबंधित तरूणाने श्वेता आणि अरूण यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाईल बंद होते. त्यांनी सातारा येथे जावून माहिती घेतली असता, जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्ता खोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली. तब्बल दोन महिन्यांनी पोलीसांनी दोघांना सैदापूर येथे ताब्यात घेतले.
श्वेता आणि अतुल या पती-पत्नीने त्याची आधार कार्ड सुद्धा बनावट ठेवली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळे पत्ते असलेले दोन-दोन आधार कार्ड आहेत. ही जोडी जाईल तेथे भाडय़ाने खोली घेवून राहते. त्यामुळे त्याचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता. हे बंटी बबली जहिरातीच्या माध्यमातून लग्नाचे अमिष दाखवून एका स्थळाकडून 30 ते 35 हजाराची मागणी करत होते. साताऱ्यात एसटी स्टॅण्ड, राजवाडा येथील हॉटेलमध्ये त्यांची मिटिंग होत असे.