गेल्या आठवडय़ात आपल्या सूर्यमालेत एक महत्त्वाची घटना घडली. तिच्या बातम्या जगभरात झळकल्या. पण भारतात कुठे दिसल्या नाहीत. कारण कोरोनाने आपल्या मीडियाचे भावविश्व अगदी व्यापून टाकले आहे. टीव्हीवर कोणतीही मराठी, हिंदी वृत्तवाहिनी लावली की आज कोरोनाची किती जणांना लागण झाली हे सांगतात. पार्श्वभूमीवर अनुप जलोटाचं ‘कैसी लागी लगन’ किंवा ‘लागीर झालं जी’ सारखं संगीत वाजवत नाहीत हे नशीब. लागणीच्या बातम्या झाल्या की मृत्यूच्या बातम्या, मग गावोगावी लॉकडाऊनचा भंग करणाऱया नागरिकांना पोलीस शिक्षा करतानाच्या चित्रफिती, त्याचा (वाहिनीवाल्यांना) कंटाळा आला की विरोधी पक्षनेते राजभवनवर गेल्याची बातमी हमखास असते! ती नसली तर ‘कोरोनाचे संकट डोक्मयावर असेपर्यंत राजकारण करू नका’ अशी फुडाऱयांची पोकळ आवाहने असतात.
या सगळय़ात बदल म्हणून त्या गरीब बिचाऱया लघुग्रहाची बातमी द्यायला काय हरकत होती? अरे, टीव्हीवाल्यांनो, समजा कोरोनाची साथ जगात आलीच नसती तर तुम्ही काय केले असते हो? टीआरपीसाठी तुम्हाला त्या लघुग्रहाचेच पाय धरावे लागले असते की नाही? पूर्वी असे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याच्या, प्रत्यक्ष जाण्याच्या घटना घडतात तेव्हा टीव्हीवर कित्ती धमाल असते. कोरोना नसता तर ही धम्माल आम्हाला नक्की बघायला मिळाली असती. म्हणजे आधी ती नुसती अधिकृत बातमी. मग हळूच तिच्यात खळबळजनक मसाला भरून प्रश्नचिन्हांकित बातमी–लघुग्रह खरोखरच कोसळला तर काय होईल? कोणत्या देशावर कोसळेल? या प्रश्नचिन्हांवर आधी अँकर लोकांचे बालीश युक्तिवाद. मग चर्चेसाठी दोन खगोलशास्त्रज्ञ, दोन ज्योतिषी, एखादा अध्यात्मवादी, एखादा बुद्धिवादी बोलावून त्यांच्या पोकळ चर्चा. युपी वगैरे प्रगत राज्यात आणि महाराष्ट्राच्या देखील काही भागात लघुग्रह कोसळू नये म्हणून यज्ञ, अन्य धर्मीयांच्या सामूहिक प्रार्थना वगैरे. एखाद्या ज्योतिषीबुवांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी. लघुग्रह कोसळला तर कोसळला, आपल्याला काही होऊ नये म्हणून आपापल्या महाराजांकडून, बुवांकडून गंडेदोरे विकत घेणाऱया लोकांच्या बातम्या.
उत्तर प्रदेशात कोरोनाबाबा नावाचा एक बुवा अवतरला आणि त्याने कोरोना होऊ नये म्हणून लोकांना ताईत विकल्याची बातमी वाचली होती. लघुग्रहाच्या बातमीला महत्त्व दिले असते तर याच बाबाने लोकांना लघुग्रहापासून रक्षण करणारे ताईत देखील दिले असते. कोरोनामुळे फार नुकसान झाले.