दलाई लामांच्या जन्मदिन सोहळय़ाने चीनचा जळफळाट
वृत्तसंस्था / लेह
भारतात तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचा जन्मदिन साजरा करणे चीनला रुचलेले नाही. चीनच्या सैनिकांनी काही नागरिकांसोबत देमचुक क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक सिंधू नदीपार क्षेत्रातून झेंडे आणि बॅनर फडकविले आहेत. ही घटना 6 जुलै रोजीची असल्याचे समजते.
कच्च्या रस्त्यावर चिनी सैनिक आणि तेथील काही नागरिक 5 वाहनांमधून आले. दलाई लामांचा जन्मदिन साजरा केला जात असलेल्या ठिकाणापासून सुमारे 200 मीटर अंतरावर त्यांनी बॅनर दाखविले आहेत अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. ही घटना डोला तामगोमधील कोयुल गावात घडली आहे. तेथे 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दलाई लामांचा जन्मदिन साजरा केला जात होता.
चिनी सैनिकांनी ज्या ठिकाणी उभे राहून बॅनर दाखविले, ते भारतात मोडते. सुमारे अर्ध्या तासापर्यंत भारतीय भूमीत उभे राहून त्यांनी आगळीक केली आहे. या लोकांनी हातात चीनचा झेंडा घेतला होता. त्यांनी झळकविलेल्या बॅनरवर लाल रंगांनी काही तरी लिहिण्यात आले होते.
मोदींकडून दलाई लामांना शुभेच्छा
दलाई लामांच्या 86 व्या जन्मदिनानिमित्त मागील आठवडय़ात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच मोदींनी जाहीरपणे दलाई लामांशी संवाद साधल्याची पुष्टी दिली होती. या कृतीतून त्यांनी चीनला संदेश दिला होता. संवेदनशील मुद्दय़ांवर भारताला ठेच पोहोचविल्यास भारतही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो असा संदेश यातून चीनला गेल्याचे मानले जात आहे.
चीनला आणखी एक झटका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी चीनला पुन्हा झटका दिला होता. व्हिएतनामचे माजी सुरक्षा अधिकारी आणि तेथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चीन्ह यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केले होते. तसेच व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याचबरोबर फाम यांना भारत दौऱयाचे निमंत्रण देखील दिले होते. तर एक आठवडय़ापूर्वी कम्युनिट पार्टी ऑफ चायनाच्या शताब्दी सोहळय़ावेळी मोदींनी कुठलाच ट्विट केला नव्हता.
भारत-चीन संबंधांमध्ये कटूता
भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये मागील वर्षापासून कटूता आली आहे. चनीने मागील वर्षी लडाख सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान तणावाचे संबंध राहिले आहेत.