ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य आज अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. चीनने त्यांची वाहनेही सीमाभागातून हटवली आहेत. त्यानंतर भारतानेही आपले जवान मागे घेतले आहेत. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट 15 आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेले आहे. रविवारी पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हा चीनने नरमाईची भूमिका घेतली होती. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला वाद हा शांततेद्वारे आणि द्विपक्षीय करारानुसार सोडवण्यात येईल. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी सीमा भागात शांतता आवश्यक आहे, असे या बैठकीत ठरले होते.
मात्र, सोमवारी चीनने पुन्हा एकदा कुरघोडी करत भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले. चीनच्या उत्तर-पश्चिम भागात अवघ्या काही तासात चीनने हे सैन्य तैनात करून भारताला आपण किती वेळात सैन्य तैनात करू शकतो हे दाखवून दिले आहे. या सैनिकांना बस, ट्रेन आणि विमानातून या ठिकाणी आणण्यात आले होते. दोन्ही सैन्य समोरासमोर आल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून चीनची सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.