लडाख…म्हटलं तर निसर्गाचा सुंदर आविष्कार, म्हटलं तर वैराण प्रदेश…म्हटलं तर पर्यटकांच्या आवडत्या स्थळांपैकी एक, म्हटलं तर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं मोलाचा विभाग…प्रदेश ऐसपैस पसरलेला, पण त्या तुलनेत लोकसंख्या कमीच…1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जम्मू-काश्मीरात समावेश होता तो लडाखसह 14 जिह्यांचा. हे नातं 2019 पर्यंत कायम राहिलं. विकासाच्या संदर्भात लडाखला सात दशकं अवलंबून राहावं लागलं ते काश्मीरवर. पण नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वषी 370 वं कलम रद्द करताना राज्याची विभागणी करून जम्मू – काश्मीर आणि लडाख अशा दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली…आता सदर भूभाग पुन्हा प्रकाशात आलाय तो चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानं. लडाखचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व, चीनचा त्याच्यावर असलेला डोळा अन् आपली तेथील संरक्षण सिद्धता यावर टाकलेली एक नजर…
लडाखची वाटचाल…
n स्वातंत्र्याच्या वेळी लडाखमध्ये लेह, गिलगिट, गिलगिट वजारत, चिल्लास आणि आदिवासी प्रांत अशा जिल्हय़ांचा समावेश होता. मात्र त्यानंतर पाकिस्ताननं 1948 मध्ये गिलगिट, गिलगिट वजारत व अन्य परिसरांवर ताबा मिळवून त्याला ‘नॉर्दर्न एरियास’ असं नाव दिलं. त्याचंच पुढं ‘गिलगिट-बाल्टिस्तान’ असं नामकरण करण्यात आलं…
n सध्याच्या केंद्रशासित प्रदेशात कारगिल आणि लेह या दोनच जिह्यांचा अंतर्भाव होतो. तेथील सर्वात मोठं शहर आहे ते लेह, त्यानंतर क्रमांक लागतो तो कारगिलचा. दोन्ही शहरं त्या त्या जिह्याची मुख्यालयं म्हणून ओळखली जातात.
n लडाख वेगळं काढल्यानंतर त्याला देशातील पहिला बौद्धबहुल अन् सर्वांत मोठा केंद्रशासित प्रदेश ठरण्याचा मान मिळालाय. 59 हजार 146 चौरस किलोमीटर्स पसरलेल्या या प्रदेशाच्या एकूण 2 लाख 74 हजार लोकसंख्येत बौद्धधर्मियांचा वाटा आहे तो 1 लाख 33 हजारांचा. चंदिगडप्रमाणंच लडाखला विधानसभा मिळालेली नसून त्यांच्यावर थेट नियंत्रण आहे ते केंद्राचं…
संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण प्रदेश…
n प्राचीन काळापासून ‘सिल्क रूट’चा एक महत्त्वाचा हिस्सा राहिलेला लडाख हा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा भाग. कारण त्याच्या सीमा पाकिस्तान व चीन या दोन्ही राष्ट्रांना भिडलेल्या आहेत…सियाचीन ग्लेसियरच्या पश्चिमेला साल्टोरो पवर्तरांगाच्या पलीकडे पाकव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांत विसावलेत, तर पूर्वेला चीनच्या कब्जात असलेला अक्साई चीन…
n लडाखच्या ईशान्य दिशेला आहे ते सियाचीन ग्लेसियर. पाकिस्तान व चीन यांना एकत्र येण्यापासून रोखण्याच्या दृष्टीनं त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय…
n लडाखमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रदेश म्हणजे कारगिल. भारताचं शेवटचं प्रत्यक्ष युद्ध लढलं गेलं ते याच भागात. स्कार्डो, लेह, श्रीनगर आणि हिमाचल प्रदेशपासून ते समान अंतरावर विसावलेलं असून निव्वळ संरक्षणच नव्हे, तर व्यापाराच्या दृष्टीनंही ते मोलाचं ठिकाण. कारगिलचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे परराष्ट्रांनी वेढलेल्या लेहला ते काश्मीरशी जोडतं…
n चीनचं पाकिस्तानवरील उतून वाहू लागलेलं प्रेम, त्यांना दिलं जाणारं वाढतं सहकार्य आणि ‘चीन-पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर’चं चाललेलं काम या पार्श्वभूमीवर या प्रांतावर काटेकोर नजर ठेवण्याची गरज येऊन ठेपलीय…
n चीनबरोबरच्या 1962 मधील युद्धाच्या वेळी ‘पँगाँग तळय़ा’पासून जवळच असलेल्या चुशूलमधील ‘स्पांगूर’ तळय़ाच्या परिसरात कडाक्याचा संघर्ष भडकला होता आणि लेहकडे आगेकूच करणाऱया चिनी लष्कराला रोखण्यात भारतीय सैन्याला यश मिळालं होतं. चुशूल भागाला या प्रदेशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याचं स्थान प्राप्त झालंय. लडाखवर आक्रमण करायचं झाल्यास आणि पुढं काश्मीरकडे मोर्चा वळवायचा झाल्यास चीनकडून या पट्टय़ाचा वापर होऊ शकतो असं मानलं जातं…
चीनकडून सतत घुसखोरी…
n सर्वात महत्त्वाचं म्हणजे वादाचा विषय बनून राहिलेली भारताची चीनबरोबरची ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ या भागामधून जाते. त्यामुळं या प्रदेशात घुसण्याचे प्रयत्न चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून (पीएलए) अनेकदा झालेत…
n 2014 साली चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पहिल्या भारत भेटीच्या आधी चुमार क्षेत्रात घुसखोरी करून तंबू उभारण्याची आगळीक ‘पीएलए’नं केली होती…त्यानंतर ’डोकलाम’वरून तर नवी दिल्ली आणि बीजिंग यांच्यात युद्धाच्या ठिणग्याच पडतात की काय अशी भीती दिसू लागली होती. त्यावेळी भारतीय आणि चिनी सैनिकांनी ‘पँगाँग’ तळय़ानजीक हाणामारी करून एकमेकांवर दगडफेक केली…
n आता त्यात भर पडलीय ती मे महिन्याच्या आरंभापासून तणावाचे ढग कायम ठेवत आलेल्या ताज्या घटनांची. भारत व चीनदरम्यान झालेल्या कराराप्रमाणं आजवर या ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’वर कधी गोळी झालेली गेलेली नसून सहसा संघर्ष मर्यादित राहिलाय तो हाणामारीवरच. मात्र यावेळी लाकडी दंडुके, लोखंडी सळय़ांचा वापर झाल्याची वृत्तं थडकलीत…
n या खेपेला चीननं घुसखोरी करताना लक्ष केंद्रीत केलंय ते गल्वान खोरं, पँगाँग त्सो, डेमच्यूक नि दौलत बेग ओल्डी या प्रांतांवर…
लडाखवरून का भडकलाय चीन ?…
n लडाखचा समुद्रसपाटीपासून 5 हजार मीटर उंचीवर विसावलेला आणि 37 हजार 244 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला अक्साई चीन हा प्रांत 1957 पासून चीनच्या ताब्यात असून 1962 च्या युद्धास कारणीभूत ठरला होता तो हाच मुद्दा. पन्नासच्या दशकात या भागातून तिबेट आणि शिनजियांग प्रांतांना जोडणारा रस्ता ‘ड्रगन’नं बांधला…
n जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्याच्या भारताच्या आक्रमक पवित्र्यामागं पूर्ण लडाखभोवतीची पकड मजबूत करण्याचा आणि पाकव्याप्त प्रदेशांवरही नियंत्रण मिळविण्याचा हेतू लपलाय अशी चीनची धारणा बनलीय. ‘ड्रगन’ला ते कुठल्याही परिस्थितीत घडलेलं नकोय, कारण त्यांचा ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’ जातोय त्याच प्रांतातून…त्याचप्रमाणं पुढं भारताकडून आपल्या ताब्यातील प्रदेशही परत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा संशय त्यांना छळायला लागलाय…
n संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं लडाखमधील ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’च्या नजीक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भारताने जो विशेष भर दिलाय त्याचीही धास्ती शी जिनपिंगच्या देशानं घेतलीय…
n काही विश्लेषकांच्या मतानुसार, चीन लडाखमधील भागासह संपूर्ण गल्वान खोऱयावरील मालकीचा दावा प्रस्थापित करण्याच्या तयारीला लागलाय. गल्वान नदी ही वादग्रस्त अक्साई चीन भागातून वाहत शिनजियांग प्रांतात जाते आणि नंतर लडाखमध्ये प्रवेश करते…
बलवान भारत…
n 1962 मधील युद्धाचा विचार करता भारत आता खूपच बदललाय, संरक्षणाच्या बाबतीत बलवान झालाय..कारगिल युद्धानंतर लगेच आपण लडाखमधील संरक्षण सिद्धता वाढविण्यावर भर देताना ‘14 कोअर’ या नव्या लष्करी तुकडीला लेहमध्ये तैनात केलं. तोपर्यंत त्या प्रदेशाची काळजी घेतली जायची ती श्रीनगरस्थित ‘15 व्या कोअर’कडून…
n ‘14 कोअर’मध्ये 3 ‘इन्फंट्री डिव्हिजन’, 8 ‘माऊंटन डिव्हिजन’, स्वतंत्र ‘सियाचीन ब्रिगेड’, ‘आर्मर्ड ब्रिगेड’ आणि राखीव ‘इन्फंट्री ब्रिगेड’चा समावेश होतो. एकूण 140 हून जास्त रणगाडे, 100 हून अधिक ‘इन्फंट्री कॉम्बॅट’ वाहने, 20 हजाराहून अधिक सैनिक तसंच 100 हून अधिक तोफा अशी त्याची ताकद…याशिवाय आणीबाणीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशात असलेली ‘39 माऊंटन डिव्हिजन’ अन् श्रीनगरच्या ‘15 व्या कोअर’खालील सैनिक व शस्त्रास्त्रं लगेच लडाखमध्ये दाखल होऊ शकतात…
n भारतानं लडाखमध्ये आवश्यक त्या प्रमाणात धावपट्टय़ा सज्ज ठेवण्यावर देखील भर दिलेला असून ‘दौलत बेग ओल्डी’ तसंच ‘न्योमा’ व ‘फूक चे’ इथं त्यांची निर्मिती करण्यात आलीय. मोठय़ा मालवाहू विमानांतून तिथं सैन्य, तोफा आणि इतर लष्करी सामग्री उतरविता येईल अशा पद्धतीनं ही आखणी करण्यात आलीय. ‘न्योमा एअरफिल्ड’ला तर हवाई तळाचं स्वरूप देण्यात येत असून त्या ठिकाणी लढाऊ विमानं तैनात करण्यात येतील…
पायाभूत साधनसुविधा निर्मितीवर भर…
n ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’च्या प्रदेशात पायाभूत साधनसुविधांची निर्मिती करण्याच्या बाबतीत चीनच्या तुलनेत भारत मागं पडलेला असला, तरी आपण ही दरी आता झपाटय़ानं भरून काढू लागलेलो आहोत. लडाख क्षेत्रात ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’कडून राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये ‘डार्बक-शायोक-दौलत बेग ओल्डी’ (डीएस-डीबीओ) रस्ता, रोहतांग बोगदा आणि लेहला मनाली नि झंस्कार खोऱयाशी जोडणारा पर्यायी रस्ता यांचा समावेश होतो…
n यापैकी चीनला खासा झोंबलाय तो 255 किलोमीटर्सचा ‘डीएस-डीबीओ’ रस्ता. तो शेवटची लष्करी चौकी असलेल्या ‘काराकोरम खिंडी’तील तळाला जोडतो. हा रस्ता ‘अक्साई चीन’जवळून जातो आणि त्याच्या आधारे भारत उद्या मनात आल्यास ‘ल्हासा-कश्घर’ महामार्गाला अपशकुन करू शकतो हा संशय ‘ड्रगन’ला छळू लागलाय…‘लेह’मधून ‘दौलत बेग ओल्डी’ला येण्यासाठी एरव्ही दोन दिवस लागतात. मात्र 17 हजार फुटांवरील या रस्त्यामुळं लष्कराला हे अंतर सहा तासांमध्ये कापता येईल…
– संकलन : राजू प्रभू