ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेऊन रेल्वे पास काढण्याच्या तयारीत असलेले मुंबईकर मात्र बेचैन झाले आहेत. त्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आणखीन दोन दिवस वाट बघावी लागणार आहे.
मुंबईकरांनो, दिनांक 19 व 20 ऑगस्ट, 2021 रोजी बृहन्मुबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. आपल्याला होणाऱया गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्ट पासून लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंबईकरांनी बृहन्मुबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईत एकीकडे कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्यात मुंबई महापालिकेला यश आलेले असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची ( मासिक पास) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी शहर व उपनगरे येथील पालिका, शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. लस लवकर मिळावी व आपले दोन डोस पूर्ण करून रेल्वे प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी सामान्य नागरिक आतूर झाला आहे. मात्र सध्या मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत अनेक केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आली आहेत.