मुंबई/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचीही संभावना तज्ञांनी वर्तविली आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी अनेकदा आणि बुधवारी पत्रकारांशी बोलताना पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. राज्यामध्ये सध्ये लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीय तर जिथे लसीकरण सुरु आहे तिथेही लसींच्या कमतरतेची चिंता व्यक्त केली जातेय. एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान “आपण वेगाने लसीकरण केलं नाही तर लोक नोकऱ्या आणि इतर कामांसाठी आता घराबाहेर पडू लागतील आणि त्यामधून करोनाची तिसरी लाट येईल,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
“डिसेंबरमध्ये लोकांना सूट देण्यात आल्याने ते बेजबादार झाले आणि त्यामुळेच फेब्रुवारीत दुसरी लाट आली. सध्या राज्यात दुसऱ्या लाटेचा कहर दिसून येतोय,” असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “आपण मोठ्या संख्येने एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केलं नाही तर ते तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं होईल,” असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.