ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
अनेक देशांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत सरकार आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीसाठी मदत मागितली आहे. WHO चे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आइलवर्ड यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आइलवर्ड म्हणाले, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये लसीची कमतरता आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्यासाठी लसीची कमतरता भासत आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर ही लस अन्य देशांना उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आणि सीरम इन्स्टिट्यूटने मदत करावी, असे WHO चे म्हणणे आहे.