सातारा / प्रतिनिधी :
ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ज्या सूचना आल्या आहेत. त्या सुचनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी लस घेतली नाही अशांना शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. उलट त्यांना 500 रुपयांचा दंड केला जाईल, त्याकरता ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेले आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज असून ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. आरटीपीसीआर टेस्टची तपासणी करण्याची क्षमता आपल्याकडे दररोज पाच हजार एवढी आहे. परदेशातून येणाऱयांची माहिती गोळा करण्याचे विमानतळावरच केले जात आहे. त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना नियमानुसार आयसोलेट व्हावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सध्या जिह्यात कोरोनाचे उपचारार्थ 216 रुग्ण आहेत. ओमिक्रॉन व्हेरीएंटची अजून भारतात एकही केस कन्फर्म नाही. परंतु डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार काळजी घेणे महत्वाचे आहे. ओमिक्रॉन हा डॉमिनोट करतो. त्यामुळे दक्षता घेतली गेली पाहिजे. ओमिक्रॉनची केस उजेडात यायला 15 ते 16 दिवस लागतात. त्यावर रिसर्च सुरु आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तयार आहे. जंबो कोव्हिड हॉस्पिटल हे 31 ऑक्टोबरपासून बंद केले असले तरीही गरज पडल्यास पुन्हा सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर कराड, म्हसवड, पाटण, कोरेगाव आदी ठिकाणी उपचार केंदे तयार आहेत. मुलांसाठीही स्वतंत्र उपचाराची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 170 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन साठा आहे. दरम्यान, औषधांचा कुठेही तुटवडा जाणवणार नाही याचीही तयारी करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांना बंदी
शासकीय कार्यालयात ज्यांनी दोन डोस घेतले नाहीत अशांना येण्यास बंदी घातली आहे. शासकीय कार्यालयाच्या गेटवरच तपासणी होणार आहे. अशी व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 500 रुपयांचा दंड केला जाईल. तसेच मास्कच्या कारवाया सुरु करण्यात येणार असून त्याकरता पथके तयार करुन पुन्हा कारवाया करण्यात येतील.