तेजप्रतापांकडून तेजस्वी यादव लक्ष्य – वडिलांना डांबून ठेवल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ पाटणा
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात संघर्ष पेटला आहे. तेज प्रताप आणि तेजस्वी यांच्यामधील लढाई आता अखेरच्या टप्प्यात पोहोचल्याचे दिसून येत आहे. लालू-राबडी यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांनी तेजस्वी यादव यांच्यावर मोठा शाब्दिक हल्ला चढविला आहे. लालूप्रसादांना दिल्लीत कैद करून ठेवण्यात आले आहे. त्यांना पाटण्यात येण्यापासून रोखले जातेय. ‘जे लोक’ राजदचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे.
लालूप्रसादांशी मी बोललो, त्यांना पाटण्यात एकत्र राहुया असे सांगितले. ते असताना आमच्या घराचा दरवाजा खुला असायचा, जनतेच्या गाठीभेटी घेण्याचे काम लालूप्रसाद करायचे. ते आमच्या वडिलांना पाटण्यात येण्यापासून रोखत आहेत. काही लोकांनी राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे लोक कोण आहेत हे मी ओळखून आहे. लालूप्रसाद तुरुंगातन बाहेर पडून वर्ष उलटले आहे. या लोकांनीच आमच्या वडिलांना दिल्लीत रोखून ठेवल्याचे म्हणत तेजप्रताप यांनी तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले आहे.
राजकीय संघर्ष अंतिम टप्प्यात
पक्षात सद्यकाळात सुरू असलेले काम पाहता संघटन वाढणार नसून तुटणार आहे. माझ्या वडिलांची प्रकृती फारशी बरी नसल्याने मी त्यांना पुठलाच त्रास देऊ इच्छित नाही. लालूप्रसादांच्या आजारपणाचा काही लोक गैरफायदा घेत असल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे. तेजप्रताप यांचे विधाने पाहता लालूप्रसादांच्या कुटुंबातील लढाई आता अंतिम टप्प्यातील पोहोचल्याचे स्पष्ट होते. तसेही मागील काही काळापासून तेजप्रताप यांनी पक्षापासून अंतर राखले आहे.
नवी संघटना स्थापन
तेजप्रताप यांनी छात्र जनशक्ती परिषद नावाने नवी संघटना स्थापन केली आहे. याच संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात स्वतःच्या समर्थकांना संबोधित करताना तेजप्रताप यांनी लालूप्रसाद यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तसेच युवा राजदपासून स्वतःच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तेजप्रताप यांच्या खुलाशानंतर पक्ष आणि कुटुंबात खळबळ उडाली आहे. कुणीच काही बोलण्यास तयार नाही.