नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यातील तणावादरम्यान नेपाळने स्वतःची आगळीक सुरूच ठेवली आहे. भारताच्या लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भूभागांवर नेपाळने दावा सांगितल्याने तणावाची स्थिती आहे. भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमा लिपुलेखमध्ये एकत्र येतात. नेपाळने याच भागानजीक आता सैन्याची पूर्ण तुकडी तैनात केली आहे. केपी शर्मा ओली सरकारच्या गृहमंत्रालयाने मागील आठवडय़ात सैन्याला एक आदेश दिला होता. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर लिपुलेख सीमेची कठोर देखरेख आवश्यक असल्याचे यात म्हटले गेले होते. या आदेशानंतर नेपाळ आर्म्ड पोलीस फोर्सची 44 वी बटालियन तेथे तैनात करण्यात आली आहे. केवळ नेपाळच नव्हे तर तेथे चीनची 150 लाइट कम्बाइंड आर्म्स ब्रिगेडही तैनात आहे. मागील महिन्यातच चीनने तेथे सैन्य पाठविले होते.