सीबीआयच्या प्राथमिक तपासातून माहिती उघड
कोलकाता / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्हय़ातील रामपूरहाट या गावात 8 जणांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. या जळीतकांडाचे कारण महामार्गांवरील ट्रक्सच्या लूटमारीतून निर्माण झालेला वाद, हे आहे, असे सीबीआयच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ट्रक्स लुटणाऱया दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण झाल्याने त्याचे पर्यवसान या जळीतकांडात झाले आहे.
या वादातून प्रथम तृणमूल काँगेसच्या बहादूर खान नावाच्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा सूड उगविण्यासाठी 70 ते 80 जणांच्या गटाने रामपूरहाट गावात भीषण दंगल केली. या दंगलीत 50 हून अधिक घरे जाळण्यात आली. यापैकी एका घरात 8 जणांनी आश्रय घेतला होता. त्यांच्यात महिला आणि मुले यांचा समावेश होता. हे सर्वजण जळून खाक झाले. ही दंगल मुस्लीमांमधीलच दोन गटांमधील होती, असेही स्पष्ट होत आहे.
रामपूरहाट गावातून जाणाऱया महामार्गावरुन वाळू, दगडी कोळसा, दगड इत्यादी वस्तूंची वाहतून ट्रक्सच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात होते. ट्रकचालकांना लुटणाऱया टोळय़ा येथे निर्माण झाल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने या टोळय़ांची मोठी दहशत येथे आहे. या टोळय़ा ट्रक्स वाटेत आडवून चालकाकडून खंडणी वसुली करतात. खंडणी न दिल्यास चालकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ट्रकमधील सर्व माल लुटला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रक चालक बिनबोभाट ही खंडणी देतात. प्रत्येक टोळीचा विशिष्ट भाग असतो. त्या भागात अन्य टोळय़ांनी लूट केल्यास त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. बीरभूमचा संघर्ष अशाच प्रकारे निर्माण झाला होता, असे चौकशीत आढळून आले आहे.