दत्तात्रय जाधव / पुणे :
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातून निर्यात होणारी जवळपास ९ लाख टन साखर बंदरात आणि कारखान्यांमध्ये अडकली असून, निर्यातीचे नवीन व्यवहार होणे बंद झाले आहे. मलेशिया, श्रीलंका आणि आफ्रिकेतील देशांना एप्रिल आणि मे महिन्यात ही साखर निर्यात केली जाणार होती. मात्र, लॉकडाऊनमुळे बंदरावर मालाची हाताळणी करण्यासाठी कामगार उपलब्ध नाहीत. तसेच ट्रकचा तुटवडा असल्याने कारखान्यांमधील साखरही बंदरापर्यंत पोहचवताना अडचणी येत असल्याचे व्यापारी आणि साखर कारखानदारांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले.
केंद्र सरकारने चालू गळीत हंगमात ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य कारखान्यांना दिले होते. कोरोनाने जगभर हाहाकार माजवण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे होते. त्यामुळे देशातून ५५ लाख टन साखर निर्यात होऊ शकेल, असा अंदाज होता. मात्र, अचानक दर ४५५ डॉलर प्रति टनावरून थेट ३२० डॉलर पर्यंत घसरल्याने साखरेची निर्यात मंदावली आहे. त्यातच यापूर्वी झालेल्या व्यवहारांची पुर्तता करताना भारतीय व्यापार्यांकडून उशीर होत असल्याने परदेशातील ग्राहक भारताऐवजी ब्राझीलला पसंती देत आहेत.
चालू गळीत हंगामात व्यापाऱ्यांनी ३६ लाख टन साखर निर्यातीचे व्यवहार केले आहेत. त्यातील २७ लाख टन साखर निर्यात झाली असून उरलेली साखरअडकून पडली आहे.“खनिज तेलाचे दर घसरल्याने जागतिक बाजारात साखरेचे दर वाढण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे देशातून यावर्षी ४५ लाख टनापेक्षा कमी साखरेची निर्यात होईल” असे वस्तू बाजार विश्लेषक राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
साखर कारखानदारांच्या अडचणी वाढणार
साखरेची निर्यात थंडावल्याने देशातील साखरेचा साठा वाढून पुढील गळीत हंगामात साखर कारखानदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कोरोनामुळे लग्ने पुढे ढकलल्याने आणि शितपेयांना उठाव नसल्याने स्थानिक बाजारातूनही साखरेची मागणी मंदावली आहे. या परिस्थितीत निर्यात थंडावल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांचे उसाचे पैसे वेळेत देताना अडचणी येत आहेत.
इंडोनेशिया भारतातून साखर आयात करण्याचा अंदाज
इंडोनेशिया दरवर्षी थायंलडमधून साखर आयात करते. यावर्षी थायलंडचे साखरेचे उत्पादन घटणार असल्याने इंडोनेशिया भारतातून साखरेची आयात करण्याची शक्यता असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचा अंदाज आहे.