ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून गंभीर रूप धारण केले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली असताना आता सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला जाहीरपणे विरोध दर्शवण्यात आला आहे.
- पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही : नवाब मलिक
यापूर्वी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनवरून मोठे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे त्यांनी नमूद म्हटले आहे. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी देखील आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. अन्य पर्यायांचा विचार सरकारने करावा, असेही भाजपचे म्हणणे आहे.
- आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करुया : आनंद महिंद्रा
दुसरीकडे व्यापारी वर्गातूनही लॉकडाऊनला आतापासूनच विरोध केला जाऊ लागला आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनला विरोध दर्शवत पुन्हा लॉकडाऊन घातक असल्याचे म्हटले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होते. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचे प्रमाण कमी करण्यावर काम करूयात, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.