प्रतिनिधी/ पणजी
कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन उठेपर्यंत मासेमारी बंद करण्याचा निर्णय मच्छिमारी खात्याने घेतला असून तसे निर्देश गोवा राज्यातील सर्व मच्छिमार सोसायटय़ा, असोसिएशन व मच्छिमारांना दिले आहेत. तसेच मच्छिमारी जेटीवरील सर्व कामकाज थांबविण्याचे व बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत जनतेला मासळी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मच्छिमारी खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांनी वरील निर्देशाची नोटीस जारी केली आहे. यापूर्वी मच्छिमारी नौका बोटी यांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा आदेश काढल्यानंतरही त्याचे पालन न करता अनेक नौका/बोटी गेल्या. त्या आता परतल्या असून मच्छीमारी जेटीवरील कामकाजही चालू असल्याचे लक्षात आल्याने त्याची गंभीर दखल घेऊन मासेमारीसह सर्व कामकाज बंद करण्याचे आदेश खात्याने जारी केले आहेत.
सर्व मालक चालकांनी त्यांच्या मच्छीमारी नौका बोटी सुरक्षित जागेत आणून नांगरून ठेवाव्यात अशी सूचना त्यांना आदेशातून देण्यात आली आहे. त्यांनी आता समुद्रात जेटीवरही जाऊ नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्या नौका/ बोटीवर काम करणाऱया सर्वांची, मालकांनी चालकांनी काळजी घ्यावी तसेच त्यांना अन्नधान्य, पाणी जीवनावश्यक वस्तू साहित्य पुरवावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान वास्को, मालीम, शापोरा आणि कुटबण या राज्यातील चार प्रमुख मच्छीमारी जेटीवर किनारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा अशी मागणी मच्छीमारी खात्याने किनारी सुरक्षा विभागाच्या उपअधिक्षकांकडे एका पत्रातून केली आहे. या चारही जेटींवर मासळी चढ उतार, खरेदी विक्री, देवाण घेवाण अशी कोणतीच कामे होऊ देवू नयेत अशी सूचना पोलिसांना केली आहे. मासळी मिळत नसल्यामुळे गोमंतकीय जनतेची मोठी गैरसोय होत असून आता तर मासेमारी बंदीमुळे मासळी मिळण्याची शक्यता दुरावली आहे.