पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केली भूमिका, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्स पाळल्यानंतरच आम्ही कोरोनाशी लढा देऊ शकतो, असे सांगत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्हा लॉकडाऊन होणार नाही, हे स्पष्ट केले.
सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत सरकारचा निर्णय जाहीर केला. बिम्समध्ये काही प्रमणात त्रुटी आहेत. त्या दूर करू असे सांगत आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या बाबतीत केलेले कार्य उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. आता प्रत्येक तालुक्मयामधील आरोग्य केंद्रामध्ये कोरोन विभाग सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ज्यांची तब्येत अत्यवस्थ आहे अशा रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाबत अ,ब,क वर्गवारी
लॉकडाऊन कितीही केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जनतेने स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाबाबत अ,ब,क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ज्याला खरोखरच कोरोना झाला आहे त्याचा समावेश अ वर्गामध्ये केला जाणार आहे व ब आणि क वर्गाच्या रुग्णांवर तालुक्मयातील आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जाणार आहेत. क वर्गामध्ये असलेल्यांना केवळ प्राथमिक लक्षणे असतील तर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिम्सबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या निवारण्यासाठी अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत. आता यापुढे जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख हे तीन तासाला एकदा सिव्हिल हॉस्पिटलला भेट देणार आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचाराबाबतची माहिती व्हिडीओद्वारे दाखविणार
कोरोना वॉर्डाबाबत वेगवेगळय़ा चर्चा व अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे आता कोरोना वॉर्डामध्ये कशा प्रकारे उपचार केले जातात हे हॉस्पिटलच्या बाहेर व्हिडीओद्वारे दाखविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनीही सहकार्य करावे. बऱयाच वेळा किरकोळ गोष्टी असतात, त्यांना अत्यंत गंभीर स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे आहे. आम्हाला चुका सांगा, त्यामध्ये आम्ही सुधारणा करू. मात्र चुकीची माहिती नागरिकांना देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे आता खासगी टॅक्सी किंवा रुग्णवाहिका भाडय़ाने घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
…तर खासगी हॉस्पिटलवर कारवाई
महत्त्वाचे म्हणजे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार पत्रकारांनी करताच यापुढे कोणत्याही खासगी हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा यावेळी दिला आहे. खासगी हॉस्पिटल तसेच दवाखाने रुग्णांसाठी खुले ठेवावेत. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.