काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यासह शुभम शेळके यांचाही अर्ज दाखल, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, आमदार व काँग्रेसचे नेते आर. व्ही. देशपांडे, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, फिरोज सेठ यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते. मंगळवार दि. 30 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मंगळवारीही अर्ज अधिक प्रमाणात दाखल होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
सतीश जारकीहोळी यांनी एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मंगळवारी एकूण 9 अर्ज दाखल झाले आहेत. सतीश जारकीहोळी यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा अध्यक्ष शुभम शेळके, विवेकानंद घंटी, नागाप्पा कळसण्णावर, अशोक हंजी, हणमंत नागनूर यांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी शेवटचा दिवस असून त्या दिवशी भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्यासह इतर काही जण अर्ज दाखल करण्याची शक्मयता आहे.
युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून त्यांना तशी सूचना मिळाल्यामुळे त्यांनी हा अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभागामध्ये मराठी भाषिक मोठय़ा संख्येने राहतात. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मराठी भाषिकांतून एकजुट झाली असून निश्चितच आम्हाला चांगली साथ मिळेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.
31 मार्च रोजी अर्जांची छाननी
त्यानंतर 31 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 3 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. आता पोटनिवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली असून 31 मार्च रोजी छाननी झाल्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्मयता आहे.
सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 3 ते 6 या वेळेत हे अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसची नेते मंडळी येत असल्यामुळे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमा झाले होते. मात्र, शक्तिप्रदर्शन करण्यावर निर्बंध असल्यामुळे कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यालयाकडे रोखून ठेवण्यात आले होते.