प्रतिनिधी/ कोरेगाव
कोरोनाच्या कारणावरुन राज्य शासनाने अद्याप वडाप वाहतुकीवरील प्रतिबंध हटविले नसल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनमरणाचा विषय बनला आहे. शासन कोणतीही दखल घेत नसल्याने नैराश्येतून ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील वडाप व्यावसायिक संजय पांडुरंग माने (वय 50) याने बुधवारी दुपारी घरातील तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोविड-19 मध्ये शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढविले. या काळात एस. टी. बससेवा, खाजगी प्रवासी बस वाहतूक, रेल्वे, रिक्षासह वडाप व्यवसायावर बंदी घातली होती. प्रवासी वाहतूक बंद असल्याने वडाप व्यावसायिक व चालक बेरोजगार झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी शासनाने एस. टी. बस वाहतूक, रेल्वे आणि रिक्षा वाहतुकीस सशर्त परवानगी दिली, मात्र वडाप व्यवसायावरील बंदी कायम ठेवली.
वडाप व्यावसायिकांनी एकत्रित येऊन संघटनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे गाऱहाणे मांडले. मात्र शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. शासनाच्या धोरणामुळे संजय माने हे नैराश्येच्या गर्तेत होते, त्यांनी आत्महत्येचा विचार आपल्या सहकारी व्यावसायिकांजवळ बोलून दाखविला होता, त्यांना अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र माने हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी जयवंत पांडुरंग माने यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी ल्हासुर्णे येथे घटनास्थळाचा पंचनामा केला. कोरेगावसह सातारा, खटाव व माण तालुक्यातील वडाप व्यावसायिकांनी ल्हासुर्णे येथे गर्दी केली होती. सायंकाळी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात ल्हासुर्णे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.