प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात विना परवाना येण्यास बंदी आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग करुन जिह्यात आलेल्या ऍड. राजेंद्रकुमार रामचंद्र गळंगे-महागावकर यांच्यासह पाच जणांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 11 रोजी सायंकाळी 5 वाजता हवालदार प्रशांत चव्हाण व होमगार्ड बर्गे हे पेट्रोलिंग करत होते. त्यांना गोपनिय माहितीनुसार ऍड. राजेंद्रकुमार रामचंद्र गळंगे-महागावकर हे पनवेलवरुन धान्याच्या ट्रकमधून आल्याचे समजले. सायंकाळी सव्वा सहा वाजता पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दि. 6 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास धान्याच्या ट्रकमधून आल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱयांची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तसेच रात्री 7.30 वाजता करंजे येथे विनोद नामदेव कदम (वय 41, रा. भाईंदर पूर्व मुंबई), हेमलता विनोद कदम (वय 38), सुविधा विनोद कदम(वय 15), शशांक विनोद कदम (वय 13) हे मुंबईवरुन आल्याचे पोलिसांना समजले. गोपनियचे कुंभार यांनी चौकशी केली असता दि. 10 रोजी रात्री पावणे अकरा वाजता रिक्षा क्रंमाक एमएच04एचजे4122 ने आल्याचे समजले. सातारा जिह्यात विना परवाना प्रवेश बंदी असताना साताऱयात आल्याने त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.