कोरोनाच्या भीतीने टाळला जातोय प्रवास, सर्रास स्वतःच्या वाहनांचा वापर
बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊन आणि त्यानंतर आता अनलॉक 4 च्या शिथिलतेनुसार हळूहळू विविध गोष्टी सुरू करायला शासनाकडून परवानगी मिळत आहे. यानुसार महिन्याभरापासून वडाव रिक्षा (मॅझिक) रस्त्यावर धावत आहेत. मात्र अद्याप कोरोनाच्या भीतीने वडाप रिक्षा प्रवास टाळला जात असल्याने वडाप चालकांना प्रवाशांचा प्रतीक्षेत बसावे लागत आहे.
आधीच कोरोनामुळे वडाप व्यवसाय साधारण 5 ते 6 महिने बंद होता. त्यानंतर अनलॉकच्या शिथिलतेनुसार सुरू झालेल्या वडाप रिक्षातून प्रवास करायला प्रवासी घाबरत आहे. त्यामुळे वडाप व्यवसाय चालक अडचणीत आले आहेत. गेल्या महिन्याभरापासून केवळ 4 ते 5 प्रवासी घेऊनच वडाप चालकांचा रिक्षा चालवावी लागत आहे. वडाप रिक्षा धावत असल्या तरी व्यवसायावर मंदी आल्याने वडाप चालक चिंतेत सापडले आहेत.
कोरोनामुळे हातावर पोट असणाऱया सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक व्यवसायावर मंदी आल्याने व्यवसायिक अडचणीत आले आहेत. शहरात वडाप व्यवसायावर पोट भरणाऱयांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात हिंडलगा, शिनोळी, उचगाव, बेकिनकेरे, गोजगा, मण्णूर आदी गावांतून बेळगावला येणाऱया वडाप रिक्षा चालकांची संख्या अंदाजे 60 आहे. या सर्व रिक्षा प्रवाशांसाठी यंदे खुट येथील स्टॅन्डवर थांबतात. यामधील अनेक वडाप चालकांनी रिक्षा घेण्यासाठी बॅंकेतून कर्ज घेतले आहे. मात्र सध्या प्रवाशांनी पाठ फिरविल्याने व्यवसाय अडचणीत आला असून बॅंकेचे हप्ते देखील भरणे कठीण झाले आहे. त्याबरोबरच उदरनिवार्ह चालविणे कठीण झाले आहे. सर्रास प्रवासी कोरोनाच्या भीतीपोटी दुचाकी व स्वतःच्या वाहनांतून प्रवास करत आहेत. त्यामुळे वडाप रिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे.
लॉकडाऊनआधी दररोज चार ते पाच फेल्या वडाप चालकांच्या व्हायच्या. मात्र आता दिवसांतून एक फेरीही होणे कठीण झाले आहे. त्यामुळे दररोजचा डिझेलचा खर्च, त्याबरोबर वाहनांचा इन्शुरन्स, टॅक्स भरणे कठीण झाले आहे. त्यातून शिल्लक राहिलेल्या पैशातून घर खर्च चालवताना संघर्ष करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे सुरूवातीला पाच महिने रिक्षा थांबून होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या वडाप चालकांना प्रवासी मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.