अध्यक्ष बजरंग पाटील यांचा सदस्य आवाडेंना अजब सवाल
ग्रा.पं.च्या निधीच्या व्याजाच्या रकमेवरून जोरदार खडाजंगी
प्रतिनिधी/कोल्हापूर
ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून दिल्या जाणाऱया शिल्लक निधीवर व्याजाची रक्कम जमा झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम शासनजमा करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. पण कोरोना काळात अगोदरच ग्रामपंचायती अडचणीत आहेत. त्यामुळे ही रक्कम परत घेऊ नये. आणि ते शासनाचे पत्र आहे, अद्यादेश नाही असे स्पष्ट करून रक्कम शासनजमा न करण्याचा ठराव करण्याची मागणी सदस्य राहूल आवाडे यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये केली. यावेळी व्याज शासनजमा करण्याबाबत अद्यादेशच आहे, केवळ पत्र नाही असे स्पष्ट करून त्याबाबत वडिलांना विचारुन आयाल का ? असा अजब सवाल अध्यक्ष बजरंग पाटील यांनी आवाडेंना उपस्थित केला. यावेळी आक्रमक झालेल्या आवाडे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा हा अपमान असल्याचे स्पष्ट करून वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रा.पं.च्या चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱया निधीवरील व्याजाची रक्कम शासनजमा करण्याबाबत नुकतेच शासनाने परिपत्रक काढले आहे. या विषयास अनुसरून सदस्य आवाडे यांनी ग्रामपंचायतीदेखील अडचणीत असल्याचे मत सर्वसाधारण सभेत मांडले. ही रक्कम शासनजमा करू नये याबाबत ठराव करण्याची मागणी आवाडे यांनी केली. पण शासनाच्या अद्यादेशाविरोधात जि.प.ला ठराव करता येणार नाही असे अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. यावेळी हा अद्यादेश नसून केवळ शासनाने परिपत्रक काढले आहे.त्यामुळे ठराव करण्यास काहीच अडचण नसल्याचे आवाडे यांनी सांगितले. या मुद्यावरून सुमारे अर्धा तास सभेत गोंधळ सुरु होता. यावेळी आपल्या मुद्यावर ठाम असलेल्या अध्यक्ष पाटील यांनी हा अद्यादेश आहे की परिपत्रक याबाबत वडिलांना विचारुन आलाय का ? असा थेट प्रश्न आवाडेंना उपस्थित केला. पाटील यांच्या वक्तव्यावरून सभागृह काही काळ अवाक झाले. यावेळी रुदावतार घेतलेल्या आवाडे यांनी हा एका आमदारांचा अपमान असल्याचे स्पष्ट करून निषेध केला. काही वेळ पाटील व आवाडे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरु होती. पण विजय भोजे, प्रसाद खोबरे, अरुण इंगवले यांनी यामध्ये हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला.
तात्यांची टोलेबाजी
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या सभेच्या मुद्यावरून विरोधकांनी घातलेल्या गोधळानंतर त्यांना सभास्थळी बसण्यास परवानगी दिली. यावेळी ‘शांतपणे बोलायचे, कुणी आवाज काढायचा नाही’ ! असा दम अध्यक्ष बजरंग पाटील (तात्या) यांनी दिला. त्यानंतर पंचायत समितीमधून सभेत सहभागी झालेल्या सदस्यांचा आवाज अस्पष्ट ऐकायला येत असल्याच्या मुद्यावरुन बोलताना पाटील यांनी ‘हवामान बरोबर नाही, पाऊस हाय ! असे सांगून विषय मारुन नेला. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेतली असेल तर आता सभास्थळी सोशल डिस्टन्स आहे काय ? असा सवाल माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला. यावेळी पदाधिकाऱयांसह अधिकारी देखील काही काळ निःशब्द झाले. यावेळी ‘मॅडम तुम्ही तरी कुठं माक्स घातलाय ? आणि सोसल डिस्टन कुठ पाळलाय ? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत अध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांनाच निशःब्द केले. पण तात्यांच्या या टोलेबाजीवरून सभागृहामध्ये मात्र वारंवार हश्श्या पिकला.