प्रतिनिधी / नागठाणे
ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर वळसे(ता.सातारा) गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर भरधाव वेगाने निघालेल्या स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.तर अन्य दोन दुचाकीवरील स्वार गंभीर जखमी झाले.शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरारक अपघात झाला.राजेंद्र हणमंत घाडगे (वय.५०,रा .समर्थनगर,ता.सातारा) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.तर अमर शिवाजी पानस्कर (वय.३२,रा.मल्हारपेठ,ता.पाटण) व कुमार माणिक पोतदार (वय.३६,रा.सासपडे,ता.सातारा) असे जखमी दुचाकीस्वारांचे नाव आहे.कारचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
याबाबत घटनास्थळ व बोरगव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी सकाळी कराड बाजूकडून साताराकडे स्विफ्ट कार भरधाव वेगाने निघाली होती.वळसे गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर ही कार आली असता तिने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली.धडक एवढी जोरदार होती की एका दुचाकीवरून साताराकडे निघालेले राजेंद्र हणमंत घाडगे हे अक्षरशः चेंडुसारखे हवेत उडाले.ते थेट सुमारे २५ ते ३० फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर जोरात आपटले.डोक्यातील हेल्मेट आधीच निघून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला.तर अन्य दोन दुचाकींवरील अमर शिवाजी पानस्कर व कुमार माणिक पोतदार हेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सातारा बाजूकडे निघालेल्या कारचे तोंड पुन्हा कराड बाजूकडे झाले होते.
अपघात झाल्याचे निदर्शनास येताच वळसे येथील ग्रामस्थांनी तात्काळ अपघात स्थळाकडे धाव घेतली.त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.मात्र उपचारापूर्वीच राजेंद्र घाडगे यांचा मृत्यू झाला.अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर कारचालक कार घटनास्थळी सोडून पळून गेला होता.अपघात एवढा भीषण होता की तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.तर एका दुचाकीचे इंजिन व टायर गाडीपासून तुटून वेगळे झाले होते.अपघातामुळे महामार्गावरील एका लेनवरची वहातुक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार मनोहर सुर्वे,किरण निकम,राहुल भोये,चालक धनंजय जाधव यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.पोलिसांनी कारचालक अभय बाळकृष्ण पाटील (रा.कार्वे नाका, कराड) याला ताब्यात घेतले आहे.अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सुर्वे करत आहेत.
अपघातात मृत झालेले राजेंद्र हणमंत घाडगे हे अतीत जवळील समर्थगाव या पुनर्वसित गावचे रहिवासी होते.ते आरोग्य विभागात कामाला होते.इंदोली (ता.कराड) अंतर्गत येणाऱ्या चोरे येथील आरोग्य उपकेंद्रात त्यांनी आरोग्य सेवक म्हणून कामाला सुरवात केली होती.त्यानंतर त्यांनी अतीत व सासपडे येथील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावली.तदनंतर नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी आरोग्य सहाय्यक म्हणूनही काम केले होते.सुमारे १५ वर्षे त्यांनी नागठाणे विभागात काम केले होते.वर्षभरापूर्वीच त्यांची आरोग्य सुपरवायझर म्हणून सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात पदोन्नती झाली होती.समर्थगावच्या विकासकामात त्यांचा मोलाचा सहभाग होता.दुचाकीवर प्रवास करताना ते नेहमीच हेल्मेटचा वापर करीत असत.अपघातावेळीही त्यांनी हेल्मेट परिधान केले होते.मात्र दुचाकीला बसलेल्या जोरदार धडकेमुळे ते हवेत उडाले. व त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटही निघून बाजूला झाले.सेवारस्त्यावरील डांबरावर ते डोक्यावर जोरात आदळल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेने समर्थगाव शोकाकुल झाले होते.