प्रतिनिधी/ चिकोडी
समाज कल्याण इलाख्याद्वारे चालविण्यात येत असलेल्या चिकोडी येथील दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात देण्यात येणाऱया भागामध्ये अळ्या आढळून आल्या. शिवाय या वसतिगृहामध्ये मुलभूत सुविधांची वाणवा असून या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सदर वसतिगृहात वास्तव्यास असणाऱया विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात येणाऱया अन्नाच्या नमुन्यासह ठिय्या आंदोलन केले. शिवाय अधिकाऱयांच्या विरुद्ध घोषणा देऊन चिकोडीच्या तालुका समाज कल्याण अधिकाऱयांना निवेदन दिले.
या निवेदनात विद्यार्थ्यांनी असे म्हटले आहे की, वसतिगृहात शुक्रवारी 3 रोजी देण्यात आलेल्या भातामध्ये अळ्या तर सांबारमध्ये केस पडल्याचे निदर्शनास आले आहे. सदर विषय तेथील प्रमुखांच्या निदर्शनास आणला असता त्यांनी जे देण्यात येते तेच खावे असे सांगत दबाव आणत आहेत. इतकेच नव्हे तर वसतिगृहात वास्तव्यास असणाऱया विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्नान करण्यासाठी स्नानगृह नाही, शौचालयांची स्वच्छता करण्यात येत नाही, ग्रंथालयासह अंथरुन व इतर सुविधाही मिळालेल्या नाहीत. वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. यामुळे येथे असलेल्या विद्यार्थ्यांना आजार आल्यास मोठी समस्या निर्माण होते. या समस्यांची कोठेही वाच्यता करण्यात येऊ नये अशी धमकीही देण्यात येते. यामुळे या वसतिगृहाच्या प्रमुखांची येथून बदली करावी व आम्हाला कायदेशीररित्या न्याय द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर वसतिगृहात विद्यार्थी गोंधळ करत असल्याची तक्रार आल्याने तालुका समाज कल्याण अधिकाऱयांनी तेथे भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गोंधळाचे मुख्य कारण सामोरे आल्याने, तालुका समाज कल्याण अधिकाऱयांना आश्चर्याचा झटका बसल्याचे तेथील बघ्यांनी सांगितले. एकंदरीत रामनगर येथील हे वसतिगृह शहराबाहेर असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब या घटनेने उघडकीस आली आहे. आता तालुका समाज कल्याण अधिकारी यावर कोणता निर्णय घेतात? याकडे सदर विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.