कडेगाव / प्रतिनिधी
वांगी तालुक्यातील कडेगाव येथे पूर्ववैमनस्यातून आंबा झाड तोडल्याचा प्रकार घडला आहे. आंबा झाड तोडणाऱ्या लक्ष्मण सदाशिव कचरे आणि सत्यवान सदाशिव कचरे या बंधूंच्या विरोधात आंबा झाड मालक शेखर दाईंगडे यांनी कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालय आणि चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेखर गोपीनाथ दाईंगडे यांचे शेतजमीन गट नंबर २०३९ मध्ये आंबा झाड आहे. सदरचे झाड हे साधारण ५० वर्ष वयाचे आहे. झाड जूने डेरेदार असल्याने त्याच्या फांद्या ही मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या आहेत. सध्या ते झाड मोहर आणि आंबा फळाने लगडले आहे. असे असताना लक्ष्मण कचरे आणि सत्यवान कचरे या कचरे बंधूंनी जून्या भांडणाचा राग काढून सदर आंबा झाडाचे नुकसान केले आहे.
आंबा झाडाच्या फांद्या तोडत असताना आंबा झाड मालक शेखर दाईंगडे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा कचरे बंधूंनी दाईंगडे यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. आम्ही झाड तोडणार आहे. झाड तोडताना आडवा आलास तर तूला ही सोडणार नाही अशी धमकी दिली. शेखर दाईंगडे यांनी याबाबत कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालय येथे विनापरवाना आंबा झाड तोडल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तसेच चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.