महामार्गावर क्वॉलीस-इंडिकाची धडक
वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वांद्री-उक्षी येथे दोन टाटा इंडिका गाडय़ांनी क्वॉलीसला धडक दिली. त्यामुळे क्वॉलीस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडला.
अपघाताबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दरीत कोसळलेल्या क्वॉलीस गाडीतील अरविंद हरिनाथ शर्मा (52, परेल मुंबई) यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात गाडीचा चालक पांडुरंग काशिनाथ पाटील व जनार्दन अंकुश माळकर (मुंबई) हे दोघे जखमी झाले आहेत.
पांडुरंग काशिनाथ पाटील (42, मुंबई) क्वॉलीस गाडी घेवून मालवणहून मुंबईला निघाले होते. याचदरम्यान टाटा इंडिका चालक अमर किसन शिंदे (सांगली ता. तासगाव) मानसकोंडहून वांद्री येथे निघाले होते. गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोन्ही गाडय़ा वांद्री उक्षी फाटय़ाजवळ आल्या असता टाटा इंडिका चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुढील क्वॉलीस चालकाला धडक दिली. त्यामुळे क्वॉलीस चालकाचाही वाहनावरील ताबा सुटून क्वॉलीस दरीत कोसळली तर टाटा इंडिका गाडी रस्त्याच्या दरडीवर सावरली. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. जावेद, सचिन भुजबळराव, संदीप जाधव, तडकर, सचिन पवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या अपघाताची खबर पांडुरंग पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.