काव्यवाचन आणि काव्यनिर्मिती हा ज्यांचा मर्मबंध, त्या प्रा. माधव सटवाणी यांना यावर्षीचा कोंकण मराठी परिषदेचा ‘कविकुलुगुरु कालिदास’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कोंकण मराठी परिषदेतर्फे पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सहकार्याने आज गुरुवार दि. 30 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख …..
प्रा. माधव सटवाणी यांना ‘कोंकण मराठी परिषदे’चा ‘कविकुलुगुरु कालिदास’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. हे वृत्त वाचून अतिशय आनंद झाला.
प्रा. माधव सटवाणी हे निष्ठावंत आणि कुशल शिक्षक आहेत. अध्यापन क्षेत्रात दोन पिढय़ांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ते सृजनशील कवी आहेत. काव्यक्षेत्रात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविली आहे. अध्यापन हे देखील सृजनशील कार्य आहे, असे ते मानतात. त्यांचे विद्यार्थी आज अनेक क्षेत्रांत चमकले आहेत. पंचक्रोशीतील जनमानसात आणि संपूर्ण गोव्यात त्यांच्या कार्याला मान्यता प्राप्त झाली आहे. अध्यापन क्षेत्रात कार्य करीत असताना अखंडितपणे त्यांनी काव्यसाधना केली. निसर्गाच्या सान्निध्यात ते राहतात. तिथे ते रमतात. तो त्यांचा सखा आहे. काव्यप्रेरणा देणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रतिमासृष्टीत निसर्गानुभूतीला प्राधान्य मिळालेले आहे. वाळपईनजीकच्या वेळूस या गावात अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. निसर्ग सौंदर्याने वेढलेले हे गाव. सत्तरीच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संचितावर त्यांचे जिवापाड प्रेम आहे. ते मूळचे बेळगावचे. वेणुग्रामचा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वारसा त्यांना तेवढाच प्रिय आहे. कारण त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे या भूमीत गेली. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथे घेतले. स्वाभाविकपणे तेथील संस्कार आणि संस्मरणे त्यांच्या मनात साठवलेली आहेत. मित्रसंवाद करताना त्या क्षणांबद्दल कृतज्ञतापूर्वक ते उल्लेख करतात. गोवा ही त्यांची कर्मभूमी. एकेकाळी ती त्यांच्या पूर्वजांचीही भूमी होती. परिस्थितीजन्य कारणांमुळे बेळगावला त्यांच्या पूर्वजांना स्थलांतर करावे लागले. योगायोगाने गोव्याच्या भूमीत ज्ञानदान करण्याची संधी प्रा. सटवाणी यांना मिळाली. सत्तरीतील नगरगाव-आंबेडे येथे ऐन तारुण्यात थोर तपस्वी साहित्यिक पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी शिक्षणप्रसारार्थ शाळा स्थापन केली होती. गोवा मुक्तीनंतर ती शासनप्रणीत झाली. सटवाणी यांनी शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला. आपल्याला या शाळेत अध्यापन करण्याची संधी मिळावी, असा विचार त्यांच्या अबोध मनात येत असे. सुदैवाने तसेच घडले. अध्यापनाचा ओनामा त्यांनी याच शाळेत केला. आजही त्या प्रसंगाची आठवण ते काढतात. त्यांच्या बोलण्याला गहिरेपणा प्राप्त होतो.
प्रा. माधव सटवाणी यांना लोकान्त आवडतो; पण त्यांना एकान्त अधिक प्रिय आहे. वाचन-चिंतन-मनन आणि कविता लेखन हा त्यांचा ध्यास आहे, श्वास आहे. मराठीबरोबरच अन्य भाषांतील वाङ्मयाचे त्यांनी वाचन केले आहे. इंग्रजी भाषेचेही अध्ययन केले. मराठीबरोबर हायर सेकंडरी स्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी अध्यापन केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी एम.ए. बी.एड. पर्यंतचे शिक्षण घेतले. उच्चविद्याविभूषित असूनही सहजतेने ते सर्वसामान्यांशी संवाद साधतात. मित्रसंवाद हा त्यांचा स्थायीभाव आहे. प्राचार्य रा. श. ग्रामोपाध्ये, सरकारी ग्रंथालयाचे ग्रंथपाल बबलादकर, सीताराम शेटय़े, चित्रसेन शबाब यांच्यासमवेत त्यांनी साहित्य कलोपासना मंडळ सुरू केले. आपले वाचन अद्ययावत व्हावे आणि अभिरुचिसंपन्न वाचकवर्ग निर्माण व्हावा, ही या उपक्रमाविषयीची त्यांची भूमिका होती. साहित्याच्या चळवळीत ते अग्रभागी राहिले. अनेक साहित्य संसथांशी ते निगडित आहेत. अबोलवृत्तीने निरलसपणे ते सतत ग्रंथप्रसाराचे कार्य करीत आले आहेत. सुदैवाने त्यांनी नामवंत साहित्यिकांची मांदियाळी लाभली. वाचनासाठी त्यांना सर्व प्रकारचे वाङ्मय प्रिय आहे. तरी काव्यवाचन आणि काव्यनिर्मिती हा त्यांचा मर्मबंध आहे. विचक्षण वृत्ती आणि डोळस रसिकता हे त्यांचे गुणविशेष आहेत. ते त्यांच्या वक्तृत्वातून दिसून येतात. पूर्वसूरींची कविता वाचणे, हा त्यांच्या ध्यासाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यांचे आतापर्यंत ‘निमग्न’ (1999) आणि ‘एक शुभ्र टिंब’ (2010) हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही संग्रहांमधून त्यांची कविप्रवृत्ती आणि बलस्थाने प्रतिबिंबित झाली आहेत. त्यांना रसिकमान्यता मिळालेली आहे. डॉ. साहेबराव खंदारे आयोजित ‘आशिएन पोएट्री’ या विश्वव्यापी ऑनलाईन कविसंमेलनासाठी त्यांच्या दोन कवितांची निवड झालेली आहे. या त्यांच्या प्रतिभेच्या आणि प्रयत्नांचे फलित म्हणजे त्यांना नुकताच जाहीर झालेला ‘कविकुलुगुरु कलिदास’ पुरस्कार!
गोव्यातील नामांकित कवी म्हणून त्यांची गणना होते. मराठीच्या मुख्य धारेत त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांना आजमितीला ‘कुसुमाग्रज पुरस्कार’, नाशिक, ‘कवी बी पुरस्कार’, अकोला, ‘कवी कृ. ब. निकुंज पुरस्कार’, बेळगाव, ‘शारदीय पुरस्कार’, होंडा, ‘यशवंत साहित्य पुरस्कार’, उगवे-पेडणे, ‘पंडित महादेवशास्त्री जोशी पुरस्कार’, बिल्वदल-सांखळी इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अन्य साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांचा यथोचित गौरव केला आहे.
चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांची-माझी मैत्री आहे. ती अभंग राहिली आहे. त्यांचा शांत, संयत आणि प्रेमळ स्वभाव मला आवडतो. या सद्भिरुचिसंपन्न मित्रासमवेत मी कैक घटका घालविल्या आहेत. त्यांचा सहवास हा एक आनंदानुभव आहे. सत्तरीचा निसर्गरम्य प्रदेश आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध असलेली स्थळे त्यांनी मला दाखविली आहेत. ठेव म्हणून या आठवणी मी जपून ठेवल्या आहेत.
कौटुंबिक जबाबदाऱया योग्यरीत्या सांभाळून त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही कविताव्रत निष्ठेने चालू ठेवले आहे. परिणत वयात त्यांची ही काव्यनिष्ठा अखंडित राहावी, ही माझी उत्कट इच्छा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने प्रा. माधव सटवाणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
– डॉ. सोमनाथ कोमरपंत