केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे मत, कोरोनाविरुद्धची लढाई निश्चितच जिंकू
प्रतिनिधी/ वास्को
तौक्ते वादळाचा तडाखा बसलेल्या सर्व राज्यांना केंद्र सरकाकडून आर्थिक सहकार्य मिळायला हवे. सरकार या सर्व राज्यांना निश्चितच मदत करेल असा आपल्याला विश्वास आहे. आपण यासंबंधी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे, असे केंद्रीय सामाजीक न्याय व सशक्तीकरण खात्याचे मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसांत कोरोनाचे संकटही ओसरणार असून कोरोनाची तिसरी लाट आल्यास सरकारने सज्जता ठेवलेली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई आम्ही निश्चितच जिंकू, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.
केंद्रीयमंत्री रामदास आठवले कोकण दौऱयावर होते. रायगड, रत्नागीरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ानंतर शुक्रवारी संध्याकाळी ते गोव्यात पोहोचले. या दौऱयात त्यांनी तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व माहिती जाणून घेतली. शनिवारी सकाळी हेडलॅण्ड सडा वास्को येथील एमपीटीच्या विश्रांतीगृहात त्यांनी भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱयांसमवेत तौक्ते वादळाच्या विषयावर पत्रकार परिषद घेतली व आपल्या पार्टीतर्फे या वादळाची झळ बसलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा राज्यांनाही नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. गुजरातमध्ये सर्वाधिक नुकसानी झालेली आहे. पंतप्रधानांनी त्या राज्याची पाहणी करून 1 हजार कोटींची मदत जाहीर केलेली आहे. इतर राज्यांनाही केंद्र सरकार नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्थिक मदत जाहीर करेल, असा आपल्याला विश्वास आहे. आपण केंद्रीय सामाजिक सशक्तीकरणमंत्री या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंबंधी पत्र लिहून पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती मंत्री आठवले यांनी यावेळी दिली. शेतकऱयांचे भारी नुकसान झालेले असून प्रत्येक शेतकऱयाला किमान 50 हजारांची भरपाई मिळायला हवी. मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही जणांना जीव गमवावा लागलेला आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र पॅकेजची व्यवस्था सरकारने करायला हवी, असे मंत्री आठवले म्हणाले.
संकट काळात एकमेकांवर आरोप करणे चुकीचे
यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाच्या प्रश्नावरही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकार कोरोना निवारण्यासाठी योग्य प्रकारे काम करीत असून या संकटाच्या काळात एकमेकांवर आरोप करणे चुकीचे आहे. सर्वांनी मिळून काम करण्याची ही वेळ आहे. ज्या महाराष्ट्र सरकारकडून लसींच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर टीका होत आहे, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालेले आहे. केंद्र सरकारनेच या लसी उपलब्ध केलेल्या आहेत, असे मंत्री आठवले म्हणाले. जेव्हा जगातील इतर देशांमध्ये कोरोना संसर्गाने गंभीर समस्या निर्माण केली होती. त्यावेळी भारतात परिस्थिती नियंत्रणात होती. अशावेळी भारतांने लसी पुरवून इतर देशांना मदत केली. त्यात चुकीचे काहीच नव्हते. भारतात आजच्या सारखी स्थिती उद्भवेल, असा अंदाजही कुणी बांधला नव्हता. मात्र, भारतात कठीण परिस्थिती उद्भवल्याने इतर देशांकडून भारतालाही मदत मिळत आहे. यासंबंधी केंद्र सरकारवर होणारे आरोप चुकीचे आहेत असे केंद्रीयमंत्री म्हणाले. भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही महाभयंकर असून या संकटामुळे आपली यंत्रणा कोलमडलेली आहे. मोठय़ा प्रमाणात जीवीतहानी झालेली आहे. मात्र, आता सरकारला आवश्यक गोष्टी उपलब्ध करण्यास यश आलेले असून मृत्यूदर व कोरोनाबाधित होण्याचा दरही खाली येत आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत दुसऱया लाटेचे संकटही ओसरणार आहे व भारतात तिसरी लाट आल्यास आता सरकारने तिला सामोरे जाण्यासाठी सज्जता ठेवलेली आहे. सरकारने लसींचे उत्पादनही वाढवण्याचे आदेश कंपन्यांना दिलेले असून सर्वांसाठी लस उपलब्ध होईल. ही लढाई आम्ही निश्चितच जिंकू. सरकार लढतच आहे. लोकांनीही सहकार्य करायला हवे. नियमांचे पालन करायला हवे, असे केंद्रीयमंत्री आठवले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे दोन जागा मागणार
पुढील वर्षी होणाऱया गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पार्टी गोवा भाजपाकडे दोन जागा मागणार आहे. त्यासंबंधी गोवा प्रदेश भाजपा तसेच या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशीही चर्चा करणार आहे. भाजपाने दोन जागा देण्याचे टाळल्यास भारतीय रिपब्लिकन पार्टी गोव्यात चार ते पाच जागा स्वतंत्ररित्या लढेल, असे केंद्रीयमंत्री आठवले म्हणाले.
पत्रकार परिषदेला आरपीआयचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब बनसोडे, आरपीआय मुरगाव तालुका अध्यक्ष रहीम खान, मुरगांवचे सचिव दिगंबर तेंडुलकर व म्हापसाचे सचिव सखाराम कोरगांवकर उपस्थित होते.