तहसीलदारांकडून तलाठय़ांना सर्व्हे करण्याचा सूचना
जामसंडे खाकशीत घराचे पत्रे उडून 20 हजाराचे नुकसान
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळ व पावसामुळे आंबा बागायतींबरोबरच घरांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. आंबा नुकसानीबाबत तालुक्यातील सर्व तलाठय़ांना सर्व्हे करण्याच्या सूचना तहसीलदार मारूती कांबळे यांनी दिल्या आहेत. तर जामसंडे खाकशी येथील रघुनाथ सखाराम कोयंडे यांच्या घराचे 20 सिमेंटपत्रे वादळाने उडाल्याने त्यांचे सुमारे 20 हजाराचे नुकसान झाले आहे.
देवगड तालुक्यात बुधवारी सायंकाळी सुमारे 6 मि. मी. इतका पाऊस पडला. मात्र, 15 मिनिटांच्या वादळाने देवगडवासीयांची दैना उडविली. वादळाने देवगड शहरात पूर्णत: धुरळा उडाला होता. आंबा कलम बागांमध्ये वाऱयाने मोठय़ा प्रमाणात आंब्याची घळ झाली आहे. कुणकेश्वर येथील रणजीत हिर्लेकर यांच्या आंबा कलम बागेत मोठय़ा प्रमाणात घळ झाली असून सुमारे 20 पेटय़ा आंबे वादळाने पडून गेले. तसेच आंबा कलमाच्या फांद्याही तुटल्या. काही गावांमध्ये घरांची छप्परे उडाली. आंबा बागायतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक गावात तलाठय़ांमार्फत नुकसानीचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
देवगड येथील उद्योजक नंदकुमार घाटे यांनीही गुरुवारी तहसीलदार कांबळे यांची भेट घेऊन आंबा नुकसानीबाबत सर्व्हे करण्याची मागणी केली. जामसंडे खाकशी येथील रघुनाथ कोयंडे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे वादळाने तुटून घरात पडले तर काही पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही. मात्र, त्यांच्या घराचे छप्पर गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतीशय गरीब असलेल्या कोयंडे कुटुंबियांना मदतीची गरज आहे. पावसापूर्वी त्यांचे छप्पर होणे आवश्यक असून दात्यांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे.