सांबरा : तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी दुपारी वादळी वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपीक पडून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
पूर्व भागातील मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्दसह मुचडी, अष्टे आदी भागात शनिवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाची तीव्रता व वाऱयाचा वेग इतका होता की, पोसवलेले बासमती पीक व पोटरी असलेली इतर भातपिके काही क्षणातच जमीनदोस्त झाली आहेत. हातातेंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्याने शतकरी हवालदिल झाला आहे. यापूर्वी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता कापणीला आलेल्या भात पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱयांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या वर्षीही शेतकऱयांना अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावे लागले होते. आता यावर्षी तीच परिस्थिती आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी भात पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.