ऑनलाईन टीम / मुंबई :
वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन काळ संपल्यानंतर सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान या दोन बंधूंना आज सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन काळ 23 एप्रिलला संपला. त्यांनतर आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली. त्यानंतर आज वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
वाधवान बंधू देशात लॉकडाऊन असतानाही गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचे पत्र घेऊन कुटुंबासोबत 7 गाड्यातून ते महाबळेश्वरला आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु, वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतले नव्हते. वाधवान कुटुंबापैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग तर नाही ना या शंकेने सीबीआयने पूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता.
वाधवान बंधू डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. याशिवाय पीएमसी बँक घोटाळ्यातही ते आरोपी आहेत.
दरम्यान, वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊन काळात प्रवासाची परवानगी दिल्याप्रकरणी गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज सौनिकया प्रकरणाची चौकशी करत असून, त्याचा अहवाल आज किंवा उद्या येईल, असेही गृहमंत्र्यांनी ट्विट केले.