ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने निनावी पत्र पाठविले आहे. या पत्रात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या 26 खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
त्या पत्रात म्हटले आहे की, एनसीबीचे पूर्वीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी अमित शाह यांना सांगून समीर वानखेडे यांची चुकीच्या पद्धतीने झोनल डायरेक्टरपदी नियुक्ती केली. तसेच समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना सर्व मार्ग अवलंबून बॉलिवूडला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचे आदेश दिले. त्यानुसार या जोडगोळीने बनावट केस उभ्या करण्यासाठी एक टीम तयार केली. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे.
वानखेडे आणि मल्होत्रा यांनी या टीमच्या आधारे बॉलिवूडच्या कलाकारांना खोटय़ा केसमध्ये अडकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडे कोटय़वधी रुपयांची मागणी करत कोटय़वधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांनाही त्यांचा वाटा दिला गेला. आतापर्यंत श्रद्धा कपूर, रकूलप्रीत सिंह, दीपिका पादुकोण, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल आणि रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती
यांच्याकडून कोटय़वधी रुपये त्यांचा वकील अयाज खान याने गोळा करुन दिल्याचेही या पत्रात म्हटले आहे.