ओटवणे /प्रतिनिधी-
बांदा – दाणोली या जिल्हामार्गादरम्यान वाफोली- धरणानजिक धोकादायक वळणावर संरक्षक कठडा नसल्याने वाहने खाली जाऊन अनेक अपघात होत आहेत. इंग्रजी एस आकाराच्या तीव्र चढाव व उतार असलेल्या या धोकादायक वळणावर संरक्षक कठडा नसल्याने याठिकाणी वाहनांना धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन याठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी या भागातून होत आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने बांदा – दाणोली हा जिल्हा मार्ग महत्त्वाचा असुन आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. संरक्षक कठड्याअभावी या वळणावर नेहमीच वाहनांचे लहान-मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी संरक्षक भिंतीसह कठडा उभरण्याबाबत सातत्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्यात येते. परंतु याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते.