प्रतिनिधी/ सातारा
परंपरेनुसार हजारो वर्षापासून चालत असलेल्या भागवत धर्माच्या पताका घेवून निघालेल्या वारकऱयांना सोशल डिस्टन्स ठेवून वारी काढण्यास मनाई केल्याच्या निषेधार्थ बंडातात्या कराडकरांनी छेडलेल्या आंदोलनामुळे त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सातारा जिह्यासह राज्यभरातील वारकऱयांनी आंदोलन पुकारले होते. सकाळपासून जिह्यातील वारकऱयांची पोलिसांनी धरपकड सुरु केली. तरीही वारकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सरकारच्या नावाने हरी विठ्ठल करत निवेदनाच्या प्रति फाडण्यात आल्या.
वारीला नियम घालून परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी वारकऱयांच्यावतीने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांना त्यांच्या आश्रमात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांना स्थानबद्धतेतून सुटका करावी यासाठी राज्यभरातून वारकऱयांनी बुधवारी आंदोलन छेडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिह्यात वारकरी सांप्रदायातील सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच घरी पोलिसांनी स्थानबद्ध करत आंदोलनकर्त्यांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. तरीही वारंकऱयांनी विठू माऊलीचा गजर करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वारकरी पोहचल्यानंतर तेथे त्यांनी महाविकास आघाडी सरकारने जर बंडातात्या कराडकरांना एकादशीपूर्वी सोडले नाही तर तीव्र आंदोलन छेडून प्रशासनाला सळो की पळो करुन सोडू असा इशारा देत निवेदनाच्या प्रति फाडण्यात आल्या. या आंदोलनात विलासबाबा जवळ यांच्यासह वारकरी सांप्रदायाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.