अनेक ठिकाणी झाडे, घरांची पडझड : सर्वत्र पुरसदृष्य परिस्थितीमुळे तारांबळ
प्रतिनिधी / पणजी
राज्यात पावसाचा जोर कायम असून दि. 18 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकणी घरांवरचे छप्पर उडाल्याचे वृत्त आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक 6 इंच पावसाची नोंद पेडणे येथे झाली आहे.
बंगालच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम गोव्यावर झाला. त्यामुळे गेले दोन दिवस गोव्यात मुसळधार पाऊस कोसळला. बुधवारीही पावसाने जोर धरला. आता हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्येही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे गोव्यात पावसाचा जोर येत्या दि. 19 जूनपर्यंत राहिल, असा इशारा दिलेला आहे. बुधवारी पहाटेपासून जोरदार वारे वाहण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर दिवसभर सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आज गुरुवारी देखील राज्यात जोरदार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
येत्या शनिवार-रविवारी जोरदार पाऊस
यंदाच्या मौसमात आतापर्यंत पेडणेमध्ये जूनच्या 16 तारखेपर्यंतच 29 इंच एवढी विक्रमी पावसाची नेंद झाली. पणजीत स. 8-30 सायं 5-10 या दरम्यान एकुण 2 इंच पावसाची नेंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 18 तारीख पर्यंत अतिवृष्टी होईल. तर 19 व 20 जून रोजी जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच बरोबर समुद्र खवळलेला असून आज समुद्राच्या लाटा 3 ते 5 मिटर्स पर्यंत उंची गाठण्याची शक्यता आहे. वाऱयाचा वेगही ताशी 40 ते 45 कि.मी. वरुन तशी 65 कि.मी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या- नाले तुडुंब भरले असून आज उद्या मुसळधार पाऊस सतत पडत राहील तर काही भागात पूर येण्याची शक्यता आहे.