कायमस्वरुपी रहदारी पोलीस नियुक्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्य बाजारपेठेत तर वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र, रविवार पेठ, कलमठ रोड, पायोनियर बँक या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. होणाऱया या सततच्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
रविवार पेठ, कलमठ रोड या परिसरात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत या भागात दुकानातील सामान ने-आण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे एखाद्या वाहनाला तासन्तास एकाच जागी थांबून रहावे लागत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही परिस्थिती संपूर्ण या भागात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना या भागातून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
या भागात जवळच एक पोलीस चौकी आहे. मात्र येथील पोलीस या भागात वाहतूक कोंडी झाल्यास ही कोंडी दूर करण्याऐवजी त्याच ठिकाणी थांबून राहत असल्याचे पाहावयास मिळते. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही ती असून अडचण नसून खोळंबा असे चित्र पाहावयास मिळत आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता त्या ठिकाणी अडकून राहिलेल्या व्यापारी, नागरिक, कार्यालयीन कर्मचारी यांनी या वाहतूक कोंडीत अधिक भर पडू नये म्हणून या ठिकाणी कायमस्वरुपी रहदारी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचीही मागणी करण्यात आली आहे.