प्रतिनिधी /बेळगाव
हिडकल जलाशयामध्ये जमीन गेलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच शहरातील विविध समस्यांचे निवारण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आमदारद्वयींनी महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांची सोमवारी सकाळी मनपा कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. तसेच रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याची सूचना आयुक्तांना केली.
हिडकल पाणीपुरवठा योजनेसाठी शेतकऱयांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी याकरिता जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आमदार सतिश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. सदर कामे अर्धवट असल्याने नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. या कामांची पूर्तता करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती आमदार सतिश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.