केंद्रीय पुरातत्व विभागाच्या माजी अधिकाऱयाचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीनजीक असणाऱया ऐतिहासिक जगप्रसिद्ध कुतुबमिनारची निर्मिती मुस्लीम आक्रमकांनी केली नसून ती विक्रमादित्य या हिंदू राजाने केली आहे. या मनोरा सूर्याच्या अभ्यासासाठी निर्माण करण्यात आला होता. नंतर मुस्लीम आक्रमकांनी त्याचे स्वरुप बदलून त्याचे नावही बदलले, असे खळबळजनक प्रतिपादन केंद्रीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी धर्मवीर शर्मा यांनी केले आहे.
एका प्रसिद्ध नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कुतुबमिनार म्हणून ओळखल्या जात असलेल्या मनोऱयासंबंधी आतापर्यंत उघड न झालेली बरीच माहिती कथन केली. हा कुतुबमिनार नसून सूर्यस्तंभ आहे, याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी या मुलाखतीत केले आहे.
कुतुबमिनार हा सरळसोट नाही. तो 25 इंच झुललेला आहे. तो सूर्याच्या अभ्यासासाठी उपयोगात आणला जात होता. त्यामुळे त्याची रचना तशी करण्यात आली आहे. याचे दरवाजे उत्तराभिमुख आहेत कारण रात्रीच्या वेळी ध्रूव ताऱयाचे दर्शन या दरवाजातून घेतले जात होते. इतरही अनेक पुरावे आहेत.
कुतुबमिनाराचे पहिले तीन मजले वालुकादगडाचे असून चौथा आणि पाचवा मजला संगमरवर आणि वालुकादगडापासून निर्माण करण्यात आलेला आहे. या मिनाराच्या तळात कुव्वत-अल-इस्लाम ही मशीद आहे. मात्र, ती हिंदू आणि जैन मंदिरे पाडवून त्यांच्या साधनसामग्रीतून बनविण्यात आलेली आहे, असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनी कुतुबमिनारचे नाव विष्णूस्तंभ असे करावे अशी मागणी केली आहे. सध्या ती आग्रहाने मांडली जात आहे.
न गंजणारा लोहस्तंभ कुतुबमिनारच्या प्रांगणात एक पाच मीटर उंचीचा लोहस्तंभ आहे. त्याची निर्मिती सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यानेच केली आहे. तो शुद्ध लोहाचा आहे आणि त्याला आजवर गेल्या अडीच हजार वर्षांमध्ये गंज चढलेला नाही. अशा लोहाची निर्मिती भारतात त्या काळी होत होती, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात तथाकथित कुतुबमिनार हा चर्चेचा मुद्दा होणार आहे.