ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
विजयनगर, दुसरा क्रॉस येथे मागील अनेक महिन्यांपासून पाणी समस्या निर्माण होत आहे. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असून अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती अथवा टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तेव्हा ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विजयनगर परिसरात पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याच परिसरात दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते. काही नागरिक थेट पाण्याची मोटार नळाला जोडत असल्याने अनेक भागात पाणी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले आहे. याबाबत वारंवार सांगण्यात आले. मात्र गांभीर्याने दखल घेण्यात येत नाही.
दरम्यान, या परिसरात कूपनलिका आहे. ती मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. ही कूपनलिका दुरुस्त केली तर काही प्रमाणात समस्या मिटणार आहे. कूपनलिका दुरुस्त केल्यानंतर काही ठिकाणी पाण्याचे छोटेखानी जलकुंभ उभे करून त्याद्वारे पाणी सोडल्यास येथील समस्या मिटणार आहे. याबाबत वारंवार ग्राम पंचायतीला सांगण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते नागेश माने यांनीही ग्राम पंचायतीला निवेदन दिले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असून त्यांनी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे. त्यामुळे तातडीने येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनावर चंद्रकांत कोलकार, मारुती साळुंखे, पुंडलिक जाधव, संजय पाटील, इंदुबाई पाटील, माधुरी पाटील, महेंद्र पाटील, सुनील उचगावकर, मोहन पाटील, भैरू ढोकरी, सुगंधा पाटील आदींच्या सह्या आहेत.