दिल्लीच्या सीमेवरील तंबू, मंडप हटवले : 15 जानेवारीला सरकारच्या अभिप्रायासंबंधी आढावा बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जवळपास 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकऱयांनी शनिवारी आंदोलनस्थळी ‘विजय दिवस’ साजरा करत जल्लोष केला. त्यानंतर आंदोलक शेतकरी माघारी निघाले. दोन दिवसांपूर्वी आंदोलन मागे घेण्याची अंतिम घोषणा करण्यात आली होती. शेतकऱयांनी आंदोलनादरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवले. ही सर्व माघारीची प्रक्रिया पूर्ण व्हायला चार ते पाच दिवस लागतील, मी स्वतः 15 डिसेंबरला आंदोलनाची जागा सोडणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता 15 जानेवारीला एक आढावा बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारने मान्य केलेले इतर मुद्दे हे अंमलात आणले जात आहेत की नाही याचा आढावा घेतला जाणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या यशाचा आनंद तर दुसरीकडे सातशेहून अधिक शेतकरी बांधवांना गमावल्याचे दुःख मनात ठेवत शेतकऱयांनी सामानाची आवराआवर सुरू केली होती. याचदरम्यान आंदोलनकाळात मदत आणि सहकार्य करणाऱया सर्व लोकांचे आभार मानण्यासाठी शनिवारी सकाळी आंदोलनस्थळी विशेष सभाही आयोजित करण्यात आली होती. संघटनेने केलेल्या आवाहनानुसार शनिवारी सकाळपासून सिंघू, टिकरी आणि गाझिपूर या सर्व ठिकाणांवरून माघारीची लगबग वाढली. गेले वर्षभर आंदोलन सुरु असताना उभारण्यात आलेले भक्कम तंबू, कमानी, मंडप हे सर्व काढण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर मुक्काम करण्याच्या हेतूने सोबत आणलेले साहित्य, आवश्यक सामान, पशूधन हे गाडय़ांमध्ये भरून परतीच्या मार्गाला शेतकरी लागले आहेत, शेतकरी घरी निघाले आहेत.
मोठय़ा संख्येने आंदोलन करणारे शेतकरी हे आता त्यांच्या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये परत निघाले. माघारी निघताना आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल, संघर्षात विजय मिळाल्याबद्दल घोषणाबाजी करत शेतकऱयांनी आंदोलनाची जागा सोडली. इतके दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतांना होणाऱया त्रासाची पर्वा न करता शेतकरी ठाण मांडून होते. यावेळी शेतकरी भावूक झाल्याचेही दिसून येत होते.
वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान मोदी यांनी मागे घेतल्याचे जाहीर केल्यावर आणि हे कायदे संसदेत रद्द करण्याचे सोपस्कार पार पडल्यावर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपल्याचे शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी जाहीर केले होते. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझिपूर या तीन सीमेवर शेतकरी जवळपास एका वर्षाहून अधिक काळ ठाण मांडून आंदोलन करत होते. आता या सर्व जागा रिकाम्या करायला सुरुवात झाली आहे.