वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विजय हजारे करंडक स्पर्धेतील बाद फेरीचे सर्व आठही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम व पालम एअरफोर्स मैदानावर खेळविण्यात येणार आहेत, असे दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील माहितगार सूत्राने सांगितले.
दिल्ली-उत्तराखंड यांच्यातील एलिमिनेटर उपउपांत्यपूर्व सामना 7 मार्च रोजी, चार उपांत्यपूर्व सामने (8 व 9 मार्च), दोन उपांत्य सामने (11 मार्च) व अंतिम सामना (14 मार्च) यांचा त्यात समावेश आहे. ‘दिल्लीमध्ये सदर सामने आयोजित करण्यात येणार असल्याचे आम्हाला माहित नव्हते. मात्र बीसीसीआयने सामने भरविण्याबाबत अचानकपणे विचारणा केल्याने डीडीसीएने तातडीची बैठक घेत सामन्यांची केंद्रे व अन्य गोष्टींना अंतिम स्वरूप दिले आहे,’ असे या सूत्राने सांगितले. या स्पर्धेतील लीग सामने सहा विविध शहरात खेळविण्यात आले होते. त्यात सुरत, इंदोर, बेंगळूर, जयपूर, कोलकाता व चेन्नई या केंद्रांचा समावेश होता.