पुणे / प्रतिनिधी :
सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि सुमारे एक ते दीड लाख वर्षांपासून मानवाचे पृथ्वीवर अस्तित्व आहे. परंतु, नियोजनाच्या अभावामुळे आणि निसर्गाच्या हातात हात घालून विकास करण्याच्या प्रयत्नात आलेल्या अपयशामुळे पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आता विज्ञानाची कास धरून जलसाक्षर समाज निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ भूजलशास्त्रज्ञ आणि भूगर्भ ऋषी डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त यंदाच्या ‘ग्रीन टिचर सन्माना’चे मानकरी सोलापूर येथील डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
वडगबाळकर म्हणाले, चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे खेडय़ापाडय़ांमध्ये पाणीप्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक सजीवाच्या चाऱयापाण्याची सोय निसर्गाने केलेली आहे. परंतु, विकासप्रकल्प राबवताना अभ्यासूवृत्तीच्या अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्याकडील भौगोलिक संरचनेत विविधता असल्यामुळे कोकणामध्ये यशस्वी झालेला प्रयोग प्रकल्प खान्देशमध्ये यशस्वी होईलच, याची खात्री देता येत नाही. तसेच खान्देशमध्ये यशस्वी झालेला प्रकल्प मराठवाडय़ात यशस्वी होईल, याचीदेखील खात्री देता येत नाही. त्यामुळे त्या-त्या भागाचा अभ्यास करूनच प्रकल्प राबविले गेले पाहिजेत.
लोकसंख्या वाढत आहे आणि निसर्ग ओरबाडला जात आहे. असे होत असताना आपण निसर्गाकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे. पर्यावरणीय समस्या उद्भवू नये, निसर्गचक्र बिघडू नये, अशी केवळ अपेक्षा आपण ठेवतो. मात्र, त्यासाठीचे आपले प्रयत्न खूप अपुरे पडतात. निसर्गामध्ये पर्यावरणीय बदल होणारच आहेत. त्या बदलांना आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो, त्यादृष्टीने आपल्याला पुढील धोरणांची आखणी करावी लागणार आहे. भूजलातील पाणीदेखील प्रदूषित होत असून, खेडय़ापाडय़ात टँकरद्वारे होणाऱया पाणीपुरवठय़प्ची गुणवत्ता तपासून पाहिली पाहिजे. विविध हजार वाढण्यामागे जलसाक्षरतेचा अभाव, हे अतिशय महत्त्वाचे कारण आहे, असेही डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी या वेळी अधोरेखित केले.
निसर्गाकडे कसे पाहतो, त्यावर आपले यश अवलंबून : ‘शान-ए-शान’
शेती आणि शेळीपालन हे लेह-लडाखमधील उत्पन्नाचे एकमेव साधन होते आणि स्नोलेपर्ड ही डोकेदुखी ठरली होती. शेतकऱयांच्या शेळय़ांवर स्नोलेपर्डने हल्ले करण्याचे प्रमाण खूप वाढल्याने स्नोलेपर्ड ही एक समस्या बनली होती. कालंतराने स्नोलेपर्डचे संवर्धन आणि पर्यटन याची योग्य सांगड घालत या समस्येवर तोडगा काढण्यात आला. आता खास स्नोलेपर्ड बघण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणावर इकडे येतात. यातून शेतीला पूरक अर्थव्यवस्था निर्माण करता आली. निसर्गाकडे आपण कसे पाहतो, त्यावर आपले यश अवलंबून आहे, असे मत लेह-लडाख येथील ‘शान-ए-शान’ अर्थात स्नोलेपर्डचे संवर्धन करणारे कार्यकर्ते खेनरब फुन्तसोग, ताशी त्सेरिंग आणि स्मानला त्सेरिंग (Khenrab Phuntsog, Tashi Tsering, Smanla Tsering) यांनी व्यक्त केले. ‘वसुंधरा मित्र पुरस्कारा’चे मानकरी लेह-लडाखचे ‘शान-ए-शान’ यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.