प्रतिनिधी/ पणजी
प्रयोगशाळेतील संशोधन लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. भविष्यात देशाची ताकद सैन्यबळावर नव्हे तर अन्नधान्य उत्पादनांवर ठरेल. त्यामुळे विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले.
दोनापावल येथे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या 54व्या स्थापनादिन कार्यक्रमात ‘सागर विज्ञान आणि समाज’ विषयार ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापावलचे संचालक प्रा. सुशीलकुमार सिंह यांची उपस्थिती होती. सुशीलकुमार सिंह यांनी प्रस्ताविक आणि राज्यपालांचा परिचय करुन दिली. या व्याख्यानात नागरिक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल मलिक यांनी सांगितले की, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे ‘समुद्र मंथन’ आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून आम्ही समुद्राच्या गर्भाशयात काय दडले आहे यांच्याशी जोडले गेलो आहोत. समुद्र हा जमिनीपेक्षा अधिक महत्वाचा आहे कारण 36 टक्के पेट्रोलियम पदार्थ, 28 टक्के वायू आणि 80 टक्के व्यापार या माध्यमातून होत आहे.
राज्यपाल म्हणाले की, समुद्री संशोधन देशासाठी महत्वाचे योगदान देत आहे परंतु प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱयांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे नोबेल पारितोषिक विजेते केवळ 12 आहेत. ज्यामध्ये 6 विदेशी आहेत. असे घडत आहे कारण वैज्ञानिक संशोधन, शिक्षण क्षेत्रात आवश्यक प्रमाणात गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण आहे. संशोधकांनी केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहणजे गरजेचे आहे.