प्रतिनिधी / विटा
विटा येथील व्यापाऱ्यांना शासनाचे सर्व नियम व अटी पाळून व्यवसाय सुरु करणेस परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी असोशिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ऋषिकेत शेळके, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत व्यापारी असोशिएशनने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, व्यापारी बांधवानी गेली दीड ते दोन महिने शासनाने घालून दिलेले लॉकडाऊन प्रामाणिकपणे पाळून शासनास पुर्ण सहकार्य केलेले आहे. विटा शहरात सध्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असून, ही शहरासाठी चांगली बाब आहे. शासनाने व्यापारी आणि कामगार वर्गाचे अतोनात होणारे नुकसान लक्षात घेवून व्यवसाय सुरु करणेस परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये बँकांनी व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज थांबविलेले होते. परंतू आजच्या परिस्थितीत व्यापाऱ्यांचे बँकांचे कर्जाचे व्याज चालू आहे. हे व्याज भरण्यास व्यापारी असमर्थ आहेत. व्यवसाय बंद असूनही कामगारांचे पगार द्यावे लागत आहेत. गाळा भाडे आणि लाईट बिल भरावे लागत आहे. दुकानातील मालाचे नुकसान मोठया प्रमाणात होत आहे. हे नुकसान व्यापारी वर्गाला मोठ्याप्रमाणामध्ये सहन करावे लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने व्यापाऱ्यांना व्यवसाय पुन्हा सुरु करणेसाठी परवानगी द्यावी. वेळेचे बंधन देवून व्यवसाय सुरु करणेची परवानगी दिल्यास नियम व अटी सर्व व्यापारी पाळून शासनास सहकार्य करणेस तयार आहोत, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन माजी आमदार सदाशिवराव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्रताप सुतार, किरण साळुंखे, प्रवीण टेके, शरद देवकर, शरद रोकडे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
पालकमंत्र्यांशी चर्चा करणार – माजी आमदार सदाशिवराव पाटील
दरम्यान लॉकडाऊन कालावधीत व्यापारी कर्जाचे बँक व्याज भरणे देखिल मुश्किल झाले आहे. आता ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी आणि बँकेचे व्याज माफ करावे, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय व्हावा, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली. त्यावर पालकमंत्र्यांशी बोलून सकारात्मक निर्णय करण्याबाबत चर्चा करू, असे आश्वासन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.