प्रतिनिधी / विटा
वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता विटा शहरात जनता कर्फ्यू लावण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे. शुक्रवार पासून सात दिवस शहरात मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातून लोक शहरात येत असतात. त्यामुळे उर्वरित तालुक्यात देखील जनता कर्फ्यू लावण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष पाटील यांनी केले आहे. दरम्यान मी सुरुवातीला विनंती करतो आहे, मात्र तरीही कोणी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या पद्धतीने कारवाई करू, असा इशारा देत विटेकरांच्या जिवापेक्षा काही मोठे नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने लॉक डाऊन जाहीर केला असला तरी सकाळी 7 ते 11 या वेळेत शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीमुळे विटा शहरासह तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा आता प्रति दिन सुमारे अडीचशेवर जाऊन पोहचला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येपुढे शहरातील आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विट्यात उद्या 30 एप्रिलपासून 7 दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मेडिकल सेवा देखील सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यतच सुरू असणार आहेत. याबाबतची घोषणा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, शासनाने लॉक डाऊन जाहीर केला असला तरी सकाळी 7 ते 11 या वेळेत शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी प्रशासनावर मोठा ताण येत आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रशासन जीव धोक्यात घालून काळजी घेत आहे. आरोग्य कर्मचारी, अगदी सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा आदी कर्मचारी कोव्हीड रुग्णालयात जाऊन सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र दुसरीकडे रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. यामध्ये सर्वानी सहकार्य करावे. यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर, माजी आमदार सदाशिभाऊ पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी देखील जनतेला आवाहन करावे, असेही वैभव पाटील म्हंणाले.
शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. सध्या ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्नांची संख्या वाढू लागली आहे. या पार्शवभूमीवर ग्रामीण भागात देखील अशा जनता कर्फ्यूची गरज आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नागराध्यक्ष पाटील यांनी केले. सुरुवातीला आम्ही आवाहन करीत आहोत. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन कोणी दुकाने सुरु ठेवली तर सुरुवातीला एक-दोनदा समजावून सांगितले जाईल. मात्र तरीही कोणी मुद्दाम अशा चुका पुन्हा करीत असेल तर मग आपल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगू असा इशारा देत विटेकरांच्या जीवापेक्ष आपल्याला मोठे काही नाही, असे वैभव पाटील म्हणाले.