विठ्ठल भक्तांची प्रतिक्षा संपली, पदस्पर्श दर्शनासाठी गुढीपाडव्यापासून सुरुवात
पंढरपूर/संतोष रणदिवे
श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन २ एप्रिलपासून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होत आहे. दोन वर्षापासून बंद असलेले पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. मोठ्या उत्साहात विठ्ठल भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले.
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले. तर, दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठलाचे मुखदर्शनच सुरू होते. महाराष्ट्र सरकारकडून गुढीपाडव्यापासून पदस्पर्श दर्शन सुरु केल्याने भाविकांना विठ्ठलाचे सावळे रूप जवळून पाहता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.