ओसीआय कार्डधारकांना बाळगावा लागणार नाही जुना पासपोर्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ओव्हरसीज सिटीज ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना प्रवासादरम्यान आता स्वतःचा जुना पासपोर्ट (पारपत्र) सोबत बाळगण्याची आवश्यकता नसणार आहे. केंदाने नवे दिशानिर्देश प्रसिद्ध करत ओसीआय कार्ड नूतनीकरणाचा कालावधी आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्डधारक जेव्हा 20 आणि 50 वर्षांच्या वयाचा होतो, तेव्हा ज्या देशात वास्तव्य असलेल्या ठिकाणी नवा पासपोर्ट तयार करवून घेत असल्यास त्याला ओसीआय कार्डही नव्याने घ्यावे लागते. तसेच ओसीआय कार्डसोबत जुना पासपोर्ट बाळगण्याची अनिवार्यता आता हटविण्यात आली आहे. आता कुठल्याही प्रवासादरम्यान ओसीआय कार्डसोबत जुना पासपोर्ट सोबत आणण्याची अनिवार्यता संपविण्यात आली आहे.
वाजपेयींच्या काळात व्यवस्था सुरू
अन्य देशाचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या लोकांना भारतीयत्वाची जाणीव करवून देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ओसीआय कार्डची सुरुवात करण्यात आली होती. ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया यांना अनिवासी भारतीय नागरिक म्हटले जाते. त्यांच्यासाठी पासपोर्टप्रमाणेच एक कार्ड प्रदान करण्यात येते. याला दीर्घ मुदतीचा व्हिसा देखील म्हटले जाऊ शकते. स्वतःच्या देशासाठी वारंवार व्हिसा घ्यावा लागू नये तसेच या कार्डच्या माध्यमातून दीर्घकाळापर्यंत व्हिसामुक्त वास्तव्य करता यावे हा यामागचा उद्देश होता.
अनिवार्यतेचे कारण
ओसीआय कार्डमध्ये नागरिकाच्या त्याच्या देशाच्या पासपोर्टचा क्रमांक नमूद असतो. याचमुळे तेथून भारतात आल्यावर भारतीय वंशाच्या ओसीआय कार्डधारक नागरिकांना पासपोर्टही बाळगावा लागत होता, जेणेकरून क्रमांकाची खात्री पटविता येईल. ही अनिवार्यता संपुष्टात आणली जावी, दोन-दोन दस्तऐवज सोबत ठेवण्याची आवश्यकता राहू नये, अशी मागणी केली जात आहे. मागील काही वर्षांमध्ये एक वेगळीच समस्या उद्भवली होती. या नागरिकांच्या पासपोर्टचा कालावधी संपल्यावर त्यांचे नवे पासपोर्ट तयार झाले होते. आता जुना पासपोर्ट सर्वसाधारपणे लोक जपून ठेवत नाहीत. तर सरकारने ओसीआयचा क्रमांक संलग्न असल्याने जुना पासपोर्ट बाळगण्याची अनिवार्यता आतापर्यंत संपुष्टात आणली नव्हती.
सरकारकडून दिलासा
दीर्घ काळापासूनची मागणी आणि विचारविनिमयानंतर अखेर केंद्र सरकारने ओसीआयसह जुन्या पासपोर्टची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. केंद्राने ओसीआय कार्डच्या नूतनीकरणाचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढवत नव्या दिशानिर्देशात जुन्या पासपोर्टच्या अनिवार्यतेची तरतूद हटविली आहे. यामुळे विदेशात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना विमानतळावर पोहोचल्यावर माघारी परतावे लागणार नाही. तसेच त्यांना आपत्कालीन व्हिसासाठी धडपड करावी लागणार नाही.