14 दिवसांचे विलगीकरण सक्तीचे : 7 दिवसांचा खर्च उचलावा लागणार
नवी दिल्ली
विदेशातून दाखल होणाऱया लोकांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यानुसार 14 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य आहे. यातील 7 दिवस सरकारकडून निश्चित शिबिरात तर उर्वरित 7 दिवस गृह विलगीकरणमध्ये रहावे लागणार आहे. सरकारकडून निश्चित केंद्रातील विलगीकरणाचा खर्च संबंधित व्यक्तीला उचलावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानोड्डाण सेवेला आता व्यापक स्तरावर प्रारंभ होणार असल्याने अनेक उपाययोजना अवलंबिल्या जाणार आहेत
- विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाला 14 दिवसांच्या विलगीकरणाची लेखी हमी द्यावी लागणार आहे. यातील 7 दिवसांचा खर्च संबंधित प्रवाशाला उचलावा लागणार आहे. गृह विलगीकरणावेळी स्वतःच्या प्रकृतीवर नजर ठेवावी लागणार आहे.
- तणावग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, कुटुंबीयांचा मृत्यू, गंभीर आजार, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना यातून वगळण्यात आले. या सर्वांची जबाबदारी राज्य सरकारची असेल. या सर्वांना गृह विलगीकरण करावे लागेल.
- प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करू नये याची माहिती तिकिटासह संबंधित यंत्रणा प्रवाशांना देणार आहेत.
- मोबाईल फोनवर आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करण्याचा सल्ला सर्व प्रवाशांना देण्यात आला आहे.
- फ्लाइट किंवा शिपमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. संसर्गाची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची अनुमती मिळणार.
- रस्तेमार्गाने देशात प्रवेश करणाऱयांनाही वरील सर्व नियमांचे पालन करावे लागणार. लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेशाची अनुमती.
- स्वयंघोषणापत्राच्या दोन प्रती भरून द्याव्या लागतील. यातील एक प्रत इमिग्रेशन सेंटरवर जमा करावी लागेल. आरोग्य सेतूवर अर्ज उपलब्ध आहे.
- सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी लागणार. विमानतळ आणि विमानात सॅनिटायजेशन, डिसइन्फेक्शनची व्यवस्था करावी लागणार.
- बोर्डिंग आणि विमानतळावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन अनिवार्य असणार आहे.
- विमानतळ, बंदर किंवा मार्ग तपासणी नाक्यावर कोविड-19 शी संबंधित घोषणा करणे अनिवार्य आहे.
- प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी मास्क परिधान केल्याची खातरजमा चालक दलाच्या सदस्यांना करावी लागणार आहे.
- आगमनावेळी विमानतळ, बंदर किंवा रस्तेमार्गावर आरोग्य पथक प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहे.
- स्क्रीनिंगदरम्यान संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱया प्रवाशाला आरोग्य कर्मचारी त्वरित आयसोलेट करतील. गरजेनुसार रुग्णालयात हलविले जाईल.
- उर्वरित प्रवाशांना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकार क्वारेंटाईन सेंटरमध्ये पाठविणार आहे.
- या प्रवाशांना 7 दिवस शासकीय विलगीकरण केंद्रात रहावे लागेल. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.