प्रतिनिधी / बेळगाव
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विद्यागम प्रणालीला कोरोनाचे विघ्न आले आहे. विद्यागमअंतर्गत शिक्षक-विद्यार्थ्यांचा परस्परांशी होणारा संपर्क धोकादायक असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यागम प्रणालीला ब्रेक लागला आहे. शिक्षणमंत्र्यांनी विद्यागम योजनेला तात्पुरती स्थगिती दिली असून यामुळे किमान आठवडय़ात दोन-तीन वेळा सार्वजनिक स्थळी भरणारी शाळा बंद राहणार आहे.
मार्च महिन्यापासून कोविडमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र 2020-21 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात ठेवण्यासाठी ऑगस्टपासून विद्यागम प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र, घरोघरी भेटी देऊन विद्यार्थ्यांना शिकविणे, सार्वजनिक स्थळी गटनिहाय विद्यार्थ्यांना शिकविणे, असा नियम असल्याने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू झाले. मात्र विद्यागमअंतर्गत विद्यार्थी किती सुरक्षित आहेत? शिक्षकच बाधित झाल्यास मुलांना याचा धोका नाही का? सार्वजनिक स्थळी विद्यार्थ्यांना शिकविताना स्वच्छता राखली जाईल का? ऑनलाईन शिक्षणाचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे विद्यागमप्रणाली जशी फायद्याची तशी तोटय़ाचीदेखील ठरली आहे.
कोरोनामुळे शिक्षकांच्या मृत्यूची संख्या, शहरातून गावात विद्यार्थ्यांना शिकविण्यास जाणारे शिक्षक आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यागम प्रणालीला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यागम प्रणालीचा मुख्य घटक असणाऱया शिक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.
अंमलबजावणीचे पर्याय बदलणे गरजेचे : आस्मा नाईक (सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कणबर्गी)
विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विद्यागम योजना सुरू केली. मात्र, याची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता मंदिर, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी बोलावून मार्गदर्शन करण्यात येत होते. यामुळे धोका निर्माण झाला. शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहतील मात्र, सार्वजनिक स्थळी ये-जा करणाऱयांची संख्या, त्या ठिकाणी सॅनिटायझेशनबाबत अनभिज्ञता असल्याने विद्यागमला स्थगिती देण्यापेक्षा अंमलबजावणीचे पर्याय बदलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार : वंदना गावडे (सरकारी मराठी शाळा, मजगाव)
विद्यागमला स्थगिती हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य आहे. मात्र, यामुळे शैक्षणिक नुकसान होणार आहे शिवाय ज्या ठिकाणी काटेकोरपणे सुरक्षिततेची अंमलबजावणी करून वर्ग घेण्यात येत होते त्यांना याची झळ बसणार आहे. विद्यार्थी हे शिक्षकांचे ऐकतात, यामुळे आठवडय़ातून किमान एकदा-दोनदा विद्यार्थ्यांशी भेट झाल्यास मुलांना भीती राहते, अभ्यास करतात, शिवाय अशिक्षित पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची चिंता राहत नाही. यामुळे स्थगितीचा निर्णय शैक्षणिकदृष्टय़ा आव्हानात्मक असल्याचे मत वंदना गावडे यांनी व्यक्त केले.
ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागेल : सिंधू पाटील (सरकारी मराठी शाळा क्र. 3, पाटील गल्ली)
सरकारी शाळेतील मुलांच्या अनुषंगाने विद्यागम प्रणाली उपयुक्त होती. शिवाय शाळा, शिक्षक यांच्याकडून विद्यार्थ्यांना केवळ आठवडय़ातून दोनवेळा तेही एक तास बोलविण्यात येत होते. यामुळे किमान सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात राखण्यासाठी योजना प्रभावी होती. अर्थात यावेळी शिक्षकांची आणि तितकीच पालकांची जबाबदारी महत्त्वाची होती. या स्थगितीमुळे मुलांचे नुकसान होणार असून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागेल, असे मत सिंधू पाटील यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळच : विमल नाईक (सरकारी मराठी शाळा, गर्लगुंजी)
विद्यागम प्रणालीला स्थगिती हा निर्णय अतिशय योग्य आहे. कोरोनाच्या लढाईत विद्यार्थ्यांची लेखन, वाचन, पुस्तकांशी बांधिलकी राखणे गरजेचे आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सार्वजनिक स्थळे सुरक्षित नसताना मुलांच्या आरोग्याचा विचार न करता विद्यागमची अंमलबजावणी करण्यात आली. शिवाय ऑनलाईन शिक्षणदेखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळच आहे. यामुळे पालक-शिक्षक परस्पर संपर्क वाढवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास नक्कीच फायदा होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
शिक्षणापेक्षा आरोग्य, सुरक्षितता महत्त्वाची
शिक्षकांवर विश्वास ठेऊन विद्यागम प्रणालीचा अवलंब करणाऱया पालकवर्गाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता शिक्षणापेक्षा आरोग्य, सुरक्षितता महत्त्वाची असल्याचा मतप्रवाह व्यक्त करण्यात आला. शिवाय मोबाईलमुळेदेखील मानसिक आरोग्याच्या, डोळय़ांच्या विकाराच्या समस्या जाणवत असल्याचे नमूद केले.
निर्णय विचारपूर्वक घेतला : रचना गावडे (पालक)
विद्यागमला बेक हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र, मोबाईल शिक्षणाचा धोकादेखील मोठा आहे. यामुळे कोरोना काळात शैक्षणिक नुकसान होत असून प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी व्हायला हवी. मुलांची काळजी शिक्षक-शाळांकडून घेण्यात येत असली तरी संसर्गाचा धोका सांगून होणारा नाही. यामुळे निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचे मत रचना गावडे यांनी व्यक्त केले.
शिक्षणापेक्षा मुलांचे आरोग्य महत्त्वाचे : लक्ष्मी सातेरी (पालक)
शिक्षणापेक्षा मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यामुळे हा निर्णय योग्य आहे. मात्र ग्रामीण भागात अचूकपणे याची अंमलबजावणी होत असल्याने आम्हाला धोका वाटला नाही. शिवाय आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा तेदेखील केवळ एक-दीड तास एकत्र येणे होत होते. त्यापेक्षा ऑनलाईन शिक्षणामुळे डोळय़ांच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे आमची द्विधा मनःस्थिती असल्याचे मत लक्ष्मी सातेरी यांनी व्यक्त केले.
पालकांची जबाबदारी आणखी वाढली : अलका तरळे (पालक)
कोरोनाच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यागम नक्कीच लाभदायक ठरली. अर्थात शिक्षकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देत सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे मुले किमान शाळा नसली तरी पुस्तक, अभ्यास यांच्याशी जोडली गेली. मात्र, येथून पुढे पालकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने सुविधांअभावी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, याला सर्वस्वी शिक्षक, विद्यार्थी अथवा पालक किंवा विद्यागम प्रणाली जबाबदार नसल्याचे मत अलका तरळे यांनी व्यक्त केले.
संसर्ग होण्याची शक्यता : पांडुरंग कुंभार (पालक)
विद्यागमला स्थगिती हा निर्णय योग्य आहे. विद्यार्थी शाळेत अथवा शिक्षक विद्यार्थ्यांकडे जाऊन शिकवित असल्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. यापेक्षा पर्याय शोधून शिक्षक-पालक परस्पर संपर्क वाढवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. अधिक प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती कधी संसर्गाचा वाहक ठरू शकेल हे सांगता येत नाही. यामुळे काही तासांचा संपर्कदेखील दुसऱयाला बाधित करू शकतो. यामुळे लेखी स्वरुपात, प्रिंटच्या स्वरुपात शिक्षकांनी अभ्यास देणे आणि पालकांनी तो करवून घेणे योग्य ठरेल, असे मत पांडुरंग कुंभार यांनी व्यक्त केले.