व्रत काळात 3 लाख लोकांनी लावली उपस्थिती, 16 ऑक्टोबर रोजी दिग्विजय उत्सव
प्रतिनिधी /काणकोण
कुमठा येथील श्री सातेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवस्थानात पर्तगाळी मठाधीश श्रीमद् विद्याद्यीशतीर्थ स्वामी महाराजांनी प्रारंभ केलेल्या चतुर्मास व्रताचा मृत्तिका विसर्जनाने समारोप करण्यात आला. मात्र 26 ऑक्टोबरपर्यंत श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींचा कुमठा येथे मुक्काम राहणार असणार आहे. 16 ऑक्टोबर हा दिवस प. पू. विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचा जन्मदिवस असून त्या दिवशी दिग्विजय उत्सव होणार आहे.
कुमठा शहरात झालेले चतुर्मास व्रत 100 टक्के यशस्वी झालेले असून ते यशस्वी होण्यासाठी येथील आबालवृद्ध, महिला वर्गाने अथक परिश्रम घेतले, अशी माहिती चतुर्मास व्रत समारंभाचे अध्यक्ष गोपाळ किणी यांनी दिली. कुमठा येथील चतुर्मास व्रत 2020 साली या ठिकाणी होणार होते. त्याची सर्व ती तयारी 2020 सालीच करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. हे चतुर्मास व्रत पूर्ण होण्यासाठी झटलेले स्वयंसेवक, महिलावर्ग, भोजन-पार्किंगची सोय केलेले सर्व मठानुयायायी यांच्याविषयी यावेळी अध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या चतुर्मास व्रतास 3 लाख लोकांनी उपस्थिती लावली. पर्तगाळी मठाच्या इतिहासातील हा विक्रम आहे. भिक्षा कार्यक्रमाने देखील आजपर्यंतचा विक्रम मोडलेला असून दिवसाला 258 इतका भिक्षा कार्यक्रम झालेला आहे. विद्यमान स्वामी महाराजांची विद्वत्ता, पांडित्य ऐकून विविध भागांतून आलेल्या अनुयायांनी स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले. या कालावधीत हरिवंश, भागवत, अवतार दर्शन, कृष्ण कथा, पौराणिक कथा, भजन यासारखे कार्यक्रम या ठिकाणी झाले. त्याचप्रमाणे मुद्राधारण आणि वैद्यकीय शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले, अशी माहिती किणी यांनी दिली.
गुरुवर्यांचा संकल्प पूर्णत्वास : विद्याधीशतीर्थ स्वामी
कुमठा येथे चतुर्मास व्हावा ही प्रिय गुरुवर्यांची इच्छा होती. आपण त्या परीक्षेत यशस्वी झालेलो असून गुरुवर्यांचा संकल्प पूर्ण झालेला आहे. यामागे गुरुस्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्याचे मत प. पू. विद्याधीशतीर्थ स्वामी म्हाराजांनी आपल्या आशीर्वचनात व्यक्त केले. देव, गुरू आणि पितरांचे स्मरण करण्याचा भाद्रपद हा महिना असून भागवत पुराण हे अठरा पुराणात श्रेष्ठ असे पुराण आहे. माणसाचे नशीब बदलत नाही. वजन वाढते, मात्र आयुष्य कमी होते. लोभ, स्वार्थ वाढतो, संकल्पपूर्ती केली जात नाही. माणसाने स्वार्थ, लोभापासून अलिप्त राहायला हवे. भागवताचे श्रवण करायला हवे, असे स्वामीजी पुढे म्हणाले.
चतुर्मास व्रत यशस्वी करण्यास हातभार लावलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ज्या ज्या व्यक्तींनी चतुर्मास व्रताला उपस्थिती लावली त्या सर्वांचे स्वामीजींनी कौतुक केले. संस्थान आणि गुरुपीठावर विश्वास ठेवून आलेल्या सर्वांचे संकल्प पूर्ण व्हावेत अशी मागणी आपण देवाकडे केली आहे, असे स्वामीजींनी सांगितले. चतुर्मास व्रत समितीचे अध्यक्ष गोपाळ किणी आणि कार्याध्यक्ष शेषगिरी शानभाग, आर. आर. कामत यांनी स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, संजय रायतूरकर, डॉ. राजन कुंकळय़ेकर, आर. आर. कामत, व्ही. जी. प्रभू, योगेश कामत, योगेश धेंपे अणि मठ समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यमान स्वामीजी हे अध्यात्म आणि तांत्रिक शिक्षणाचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व असून पर्तगाळी मठाच्या प्रगतीत गुरुस्वामींचे मोठे योगदान असल्याचे मत दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. अनंत शानभाग यांनी आभार मानले.